मुंबई : शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत महापौर ते लोकसभा अध्यक्षपद अशी विविध महत्त्वाची पदे भूषविलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (८६) यांचे शुक्रवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. जोशी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवसेनेचा ‘कोहिनूर हिरा’ हरपला अशीच सार्वत्रिक भावना त्यांच्या निधनानंतर व्यक्त झाली. शिवसेनेत ‘सर’ या बिरुदाने प्रसिद्ध असलेले मनोहर जोशी गेल्या मे महिन्यापासून आजारी होते. बुधवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने माहीममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…
Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

हेही वाचा >>>सध्याचे शिक्षण परवडण्यासारखे राहिलेले नाही, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे सरकारची घटनात्मक जबाबदारी

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, महापौर, विधानसभा आणि विधान परिषदेची आमदारकी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा चढत्या क्रमाने त्यांचा राजकीय प्रवास झाला. रायगड जिल्ह्यातील नांदवी येथे जन्मलेल्या मनोहर जोशी यांनी लहानपणी गरिबी अनुभवली. त्यांनी भिक्षुकी करून शिक्षण घेतले. त्यांच्याकडे शिकण्याची जिद्द प्रचंड होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी एम. ए, एल. एल. बी.पर्यंत शिक्षण घेतले. १९६०च्या दशकात मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी त्यांनी पत्करली. याच काळात त्यांनी कोहिनूर क्लासेसची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी १९६७मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. ज्या मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून नोकरी केली त्याच महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी १९७६-७७ मध्ये महापौरपद भूषवले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केलेल्या जोशी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. महापौरपद, आमदारकी अशा चढत्या क्रमाने त्यांची राजकीय वाटचाल झाली. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर मुंबईचे विविध प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले होते.

मुख्यमंत्रिपदी असताना एक रुपयात झुणका-भाकर ही त्यांची योजना चांगलीच गाजली होती. मुंबई आणि नागपूरमध्ये महापौर परिषद, शहरांच्या विकासासाठी विशेष निधी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. मुंबईतील ५५ उड्डाण पूल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग असे विविध प्रकल्प नितीन गडकरी यांनी राबविले असले तरी ते मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मार्गी लागले होते. ‘बॉम्बे’चे मुंबई करण्याचा निर्णय जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झाला होता.

हेही वाचा >>>मुंबईतील डब्बेवाल्यांच्या पाल्यांना नागपुरातून मदतीचा हात…

तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याशी उडणारे खटके, ५५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याने त्यांना चुचकारण्याबरोबरच ‘मातोश्री’ची मर्जी राखताना जोशी यांना पावणेचार वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तारेवरची कसरत करावी लागली होती.

कोहिनूर क्लासेस

मनोहर जोशी यांनी स्थापन केलेल्या कोहिनूर क्लासेसची हजारो तरुणांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत झाली. ‘नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार व्हायला हवेत’ हा मूलमंत्र जोशी यांनी दिला होता.

आमदारकी रद्द आणि बहाल

मनोहर जोशी यांनी १९९०च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे भाऊराव पाटील यांचा दादर मतदारसंघात पराभव केला होता. धार्मिक आधावर ही निवडणूक लढविण्यात आल्याचा आक्षेप पाटील यांनी घेतला होता. जोशी यांनी धार्मिक प्रचार करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा मुद्दा पाटील यांनी मांडला होता. भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन न्यायमूर्ती वरियावा यांनी मनोहर जोशी यांची आमदारकी रद्द केली होती. पुढे उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला होता.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, माजी मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवासस्थानी जाऊन मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तर उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री शंभूराज देसाई आदींनी स्मशानभूमीत उपस्थित राहत जोशी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

मनोहर जोशीजी यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. ते एक जुनेजाणते नेते होते, ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे सार्वजनिक सेवेसाठी व्यतीत केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जोशी यांनी राज्याच्या प्रगतीकरता अथक प्रयत्न केले. तसेच केंद्रीय मंत्री म्हणून देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या काळात जोशी यांनी संसदेचे कामकाज अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रयत्न केले. चारही विधानमंडळांमध्ये काम करण्याचा बहुमान लाभलेले मनोहर जोशी त्यांच्या व्यासंगाबद्दल स्मरणात राहतील.  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. शिवसेनेचा कोहिनूर हिरा हरपला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला आहे.– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री, लोकसभा सभापती आणि शिवसेना नेते म्हणून मनोहर जोशी यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.   महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय, त्याचबरोबर वेगवेगळय़ा प्रकारच्या सैनिकी शाळा, बचत गटांना चालना आणि महिला आरक्षणाबद्दलसुद्धा त्यांनी अनुकूल भूमिका घेतली होती.-डॉ. नीलम गोऱ्हे,  विधान परिषदेच्या उपसभापती 

मनोहर जोशी यांच्या निधनामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे. संकटकाळातही शिवसेनेबरोबर राहिले. मनोहर जोशी पहिल्या फळीतील सच्चे शिवसैनिक होते.  जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे आपले दुर्दैव आहे. जोशी यांच्यासारख्या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटावर मात करून वेळोवेळी उभी राहिली. –  उद्धव ठाकरे , शिवसेना पक्षप्रमुख

शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते, जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाले. शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे