मुंबई : राज्याचे माजी पोलीस महासंचालक व माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी माझी भेट घेऊन मी लोकसभेसाठी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याला मी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पांडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

मुंबईतील मतदानाला अवघे २० दिवस उरले असताना सर्व पक्षांनी आता उमेदवार घोषित केले आहेत. या २० दिवसांत २० लाख मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य आहे का? त्यामुळे केवळ पक्षाच्या जोरावर ही निवडणूक लढवली जात आहे. त्याला एक पर्याय म्हणून, स्थानिक उमेदवार म्हणून मी रिंगणात उतरणार आहे. माझ्या पाठीशी स्थानिक नागरिक असून ते माझ्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून पर्याय पडताळून पाहत होतो, असे पांडे यांनी सांगितले.

हेही वाचा…मुंबई : मतदान केंद्रांवर ‘आपला दवाखाना’ आरोग्य सेवा पुरवणार

उत्तर मध्य मुंबईतून यापूर्वी भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उज्ज्वल निकम व काँग्रेसकडून वर्षा गायकवाड निवडणूक लढवत असल्यामुळे या मतदार संघात अत्यंत चुरशीची लढात आहे. त्यात आता माजी पोलीस आयुक्त संजय पांडेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहिल्यास मतदार संघातील लढत आणखी वाढणार आहे.

पांडे हे १९८६ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूर येथून माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून त्यांचा पोलीस सेवेतील कार्यकाळ सुरू झाला. मुंबईत १९९२-९३ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. त्यावेळी त्यांनी मोहल्ला कमिटीचा प्रयोग यशस्वीपणे राबवला. श्रीकृष्ण आयोगानेही त्यांच्या या कामाचा उल्लेख अहवालात केला आहे. मुंबईत त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या परिमंडळ-८ चे ते पहिले पोलिस उपायुक्त होते. त्याकाळात त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक, आर्थिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्त्व केले.

हेही वाचा…मुंबई : भांडुपमध्ये आढळली तीन कोटींची रक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९५ ते १९९८ या युती सरकारच्या कालावधीतील राजकीय दबाव झुगारून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्याविरोधात कारवाया केल्या. त्यानंतर त्यांना कमी महत्त्वाच्या पदांची जबाबदारी मिळाली. १९९८ मध्ये हॉवर्ड विद्यापीठात मास्टर्स केल्यानंतर ते काही काळ तत्कालीन पंतप्रधान यांच्या सुरक्षा पथकात होते. २००१ मध्ये त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला. तो स्वीकारण्यात आला नाही. प्रकरण न्यायालयात गेले. त्यावेळी त्यांनी स्वेच्छा निवृत्तीही घेण्याचा प्रयत्न केला. न्यायालयीन लढाईनंतर २०११ मध्ये ते पुन्हा पोलिस दलात परतले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. पांडे हे ३० जून २०२२ रोजी मुंबई पोलिस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले आहेत. भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पांडे यांना अटक केली होती. ते चार महिने न्यायालयीने कोठडीत होते.