मुंबई व इतर शहरांमधील रेडी रेकनरच्या दरवाढीचे तीव्र पडसाद गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. काँग्रेसच्या मंत्र्यांनीच त्याला जोरदार विरोध केला. सर्वसामान्य माणसाला, मध्यमवर्गीयांना शहरात घरे घेणेच मुश्कील होऊन बसले असून या दरवाढीचा फेरविचार करावा, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेड रेकनरची दरवाढ कमी करण्याचे संकेत दिले.
प्रथेप्रमाणे नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी रेडी रेकनरचे नवे दर जाहीर करण्यात आले. मुंबईत २० टक्क्य़ांनी हे दर वाढले आहेत. पुणे, ठाणे, नवी मुंबई इत्यादी शहरांमध्येही दर वाढलेले आहेत. त्याचा परिणाम घरांच्या खरेदी-विक्रीवर होणार आहे.
विशेषत काँग्रेसच्या मंत्र्यांनीच हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. रेडी रेकनरच्या दरवाढीला उद्योग मंत्री नारायण राणे, महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षां गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री नसिम खान आदी मंत्र्यांनी या दरवाढीचा फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनीही मंत्र्यांची मागणी रास्त असल्याचे मान्य करीत दर कमी करण्याचे संकेत दिले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यावर मग संबंधित अधिकाऱ्यांना रेडी रेकनरच्या दरवाढीचा फेरआढावा घेण्याच्या सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
.. तर मध्यमवर्गीयांना घर कसे परवडणार?
रेडी रेकनरचे दर वाढले की, त्यावरील मुद्रांक शुल्क वाढणार, मालमत्ता करातही वाढ होणार, अशा वेळी सर्वसामान्य माणसाला किंवा मध्यमवर्गीयांनाही घर घेण्याचा साधा विचार सुद्धा करता येणार नाही, अशा तीव्र प्रतिक्रिया मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. रेडी रेकनरचे दर ठरविण्याची पद्धतीही कालबाह्य़ झाली आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने दर ठरवायला हवेत, असा मुद्दा काही मंत्र्यांनी मांडला. त्यावर दर कमी झाले पाहिजेत, असाच एकंदरीत मंत्रिमंडळाचा सूर होता.