हर्षद मेहता याने केलेल्या शेअर बाजार घोटाळ्याच्या २४ वर्षांनंतर उच्च न्यायालयाने मेहता याचा भाऊ सुधीर याच्यासह सहाजणांना या घोटाळ्याप्रकरणी दोषी धरत त्यांना शिक्षा सुनावली आहे.

न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर- जोशी यांनी सुधीर मेहता याच्यासह हर्षदचा चुलतभाऊ दीपक, एनएचबी अधिकारी सी. रविकुमार आणि सुरेश बाबू, माजी स्टेट बँक अधिकारी आर. सीताराम आणि दलाल अतुल पारेख यांना या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवले. न्यायालयाने दीपक याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली असून बाबू यांना तीन वर्षे तर उर्वरित आरोपींना प्रत्येकी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेत दया दाखवण्याची विनंती आरोपींनी केली होती. या घोटाळ्याच्या परिणाम लोकांनी पाहिले आणि अनुभवले आहेत. या घोटाळ्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात धक्का बसून ती डळमळीत झाली होती. त्यामुळेच घोटाळ्याचे स्वरूप आणि त्यातील गांभीर्य लक्षात घेता त्यांना ही दया दाखवता येऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांनी विनंती फेटाळून लावली. परंतु न्यायालयाने या सगळ्या आरोपींना जामीन मंजूर करत निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची परवानगी दिली.

सुधीर याला न्यायालयाने घोटाळ्याच्या कटात मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे, तर अन्य आरोपींना फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फौजदारी कट, फौजदारी विश्वासघात आदी विविध आरोपांअंतर्गत दोषी ठरवले.

  • १९९२ मध्ये हर्षद मेहता याने बँकांचे पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटी रुपयांचा भांडवल बाजार घोटाळा केला होता. परंतु या घोटाळ्याचा कर्ताकरविता हर्षद मेहता याचा २३ एप्रिल २००२ मध्ये मृत्यू झाल्याने त्याच्यावरील गुन्हे हे रद्द झाले.