मुंबई: मुंबईत अद्याप मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले नसले तरी मुंबईकरांचा आजचा दिवस पावसाच्या रौद्ररुपासह उजाडला आहे. मुंबईतील अनेक भागांत काल रात्रीपासून संततधार असून नरिमन पॉईंट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे नोंदींवरून दिसते आहे. अवघ्या एका तासांत, सकाळी ९ ते १० या वेळेत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल १०४ मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पाणी साचले आहे.

सकाळीच पावसाने जोर धरल्यामुळे कर्मचारी वर्गाची कार्यालय गाठताना तारांबळ उडाली आहे. दरम्यान, सकाळी ९ ते १० या वेळेत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या परिसरात रविवारपासून पाऊस पडत आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे.

अतिवृष्टी म्हणजे काय ?

अतिवृष्टी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस, जो अल्प कालावधीत किंवा एका दिवसात एखाद्या भागात होतो.

मोठी भरती…

दरम्यान समुद्राची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या लाटा उसळत आहेत. पूर्ण भरती असताना आज ४.७५ मिटर उंच लाटा उसळण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. अद्यापही पावसाने विश्रांती घेतलेली नाही. त्यातच भरती सुरू झाल्यामुळे पाणी ओसरण्यास वेळ लागत आहे. शहरातील वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे वाहतूक सेवाही कोलमडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत शिवडी कोळीवाडा येथे १२ मिमी, गोखले रोड महानगरपालिका शाळा-११ मिमी, चेंबूर कलेक्टर कॉलनी-१३ मिमी, चेंबूर अग्निशमन केंद्र ९ मिमी, नारियलवाडी सांताक्रूझ – २५ मिमी, खार दांडा- २४ मिमी, विलेपार्ले अग्निशमन केंद्र -१५ मिमी, मालवणी अग्निशमन केंद्र – १२ मिमी आणि वर्सोवा उदंचन केंद्र येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.