मुंबई : मुसळधार पावसामुळे वाळकेश्वर परिसरातील तीन बत्ती येथील दोन मजली इमारतीची संरक्षक भिंत सोमवारी कोसळली असून परिणामी इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. म्हाडाने या इमारतीतील एकूण पाच कुटुंबांच्या निवाऱ्याची माझगावमधील घोडपदेव येथील संक्रमण शिबिरात व्यवस्था केली आहे. मात्र, संक्रमण शिबिरातील घरांमध्ये वीज, पाण्याची टाकी नसल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. तसेच, पाऊस सुरू झाल्यांनतर घरांच्या छतातून गळती होत असल्याने दुर्घटनाग्रस्तांची तारांबळ उडत आहे.

मुंबईत सोमवारी दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे मुंबईकर बेहाल झाले. अनेक ठिकाणी पडझडच्या घटना घडल्या. दरम्यान, वाळकेश्वर येथील तीन बत्ती परिसरातील रुबी हिल इमारतीची संरक्षक भिंत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक कोसळली. सुदैवाने दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीवर संबंधित घरे वसली होती. भिंत कोसळल्याने आता घरे राहण्यासाठी असुरक्षित झाली आहेत. त्यामुळे संबंधित भागात प्रवेश करण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली असून त्यांची घोडपदेव येथील संक्रमण शिबिरात रहिवाशांची रवानगी करण्यात आली. संबंधित इमारत धोकादायक बनल्यामुळे त्याचे तोडकाम करण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घेतला आहे. मात्र, घरात असलेल्या सर्व सामानाची चिंता रहिवाशांना सतावत आहे. घरातील मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रे घेण्यासाठी यंत्रणांच्या देखरेखीत रहिवाशांना घरांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, संक्रमण शिबिरात रवानगी केलेल्या रहिवाशांची तेथील असुविधेमुळे प्रचंड गैरसोय होत आहे. संक्रमण शिबिरातील घरांमध्ये वीज आणि पाण्याची सोया नसल्याचा आरोप दुर्घटनाग्रस्तांनी केला आहे. तसेच, घरांमध्ये प्रचंड अस्वच्छता असून घरांची मोडतोड झाल्याचेही आरोप त्यांनी केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी म्हाडाने कधीही इमारत धोकादायक असल्याचे घोषित केले नाही. मात्र, आता अचानक संरक्षक भिंत कोसळल्याने इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे आता हक्काचे घर गमावण्याची वेळ आली असून संक्रमण शिबिरात देखील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असे रहिवासी प्रमोद दुषणकर यांनी सांगितले