मुंबई : विभक्त पत्नी हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंबानी यांच्या हत्येचा छडा लावू न शकलेल्या पोलिसांनी आपल्या वैवाहिक कलहाचा गैरफायदा घेतला. तसेच  लक्ष्य करून प्रकरणी गोवले, असा दावा चित्रकार चिंतन उपाध्याय याने गुरुवारी दिंडोशी सत्र न्यायालयात केला.

हेमा आणि भंबानी यांच्या हत्येप्रकरणी उपाध्याय याच्याविरोधात दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. सरकारी पक्षाने त्याच्याविरोधात न्यायालयात सादर केलेल्या साक्षीपुराव्यांवर आरोपी म्हणून उपाध्याय याचे म्हणणे न्यायालयाने गुरुवारी नोंदवण्यास सुरुवात केली. फौजदारी प्रक्रियेच्या कलम ३१३ नुसार, त्याचा जबाब न्यायालय नोंदवत आहे. साक्षीपुराव्यांबाबत म्हणणे मांडताना उपाध्याय याने उपरोक्त दावा केला. तसेच अटकेनंतर पोलिसांनी बळजबरीने आपला कबुलीजबाब घेतला. त्यासाठी पोलिसांनी   छळ केल्याचेही त्याने  सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकरण काय?

हेमा आणि भंबानी यांची ११ डिसेंबर २०१५ रोजी हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांचे मृतदेह एका खोक्यात ठेवून कांदिवली येथे फेकण्यात आला होता. मुख्य आरोपी विद्याधर राजभर हा फरार असताना, हेमा हिच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी उपाध्याय याला अटक केली होती. उपाध्याय याला वैवाहिक वाद संपवायचा होता. म्हणूनच त्याने हेमाच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सहा वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उपाध्याय याला जामीन मंजूर केला होता.