मुंबई : शाळा तर सुरू होणारच आहेत, पण त्याआधी १५ ते २० दिवस पावसाने आरंभ केल्याने हाती चिमुकल्यांसह उरलेल्या काही सुट्ट्यांचा विनियोग नजीकच्या रिसॉर्ट व वॉटर पार्कमध्ये जाऊन करण्याचा बेत पालकांनी आखला आहे. बहुसंख्य पालकांनी मुलांना घेऊन फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. विशेषत: एक ते दोन दिवसीय सहलींना नागरिकांची पसंती असून विविध ठिकाणच्या वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत.

गेले काही दिवस मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला असून विविध पर्यटनस्थळे नागरिकांना खुणावू लागली आहेत. समुद्रकिनारे असो किंवा धबधब्याजवळ जाण्याचे नियोजन नागरिकांकडून केले जात आहे. तर एप्रिल – मे महिन्यात मोठी उन्हाळी सुट्टी घेऊन गावी फिरून आल्यानंतर नागरिकांना आता पावसाळी सहलीचे वेध लागलेले आहेत. तर दुसरीकडे शाळा व महाविद्यालये लवकरच सुरू होणार असल्यामुळे नागरिक आपल्या मुलांना घेऊन पर्यटनस्थळी जात आहेत. विशेष बाब म्हणजे समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या रिसॉर्टना नागरिकांची मोठी पसंती असून वसई, नालासोपारा आणि विरारमधील वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात येत आहे. तसेच वॉटर पार्क व रिसॉर्टमधील विविध शाकाहारी व मांसाहारी पदार्थांवर ताव मारला जात असून सहकुटुंब विविध खेळ खेळून नागरिक मनसोक्तपणे आनंद लुटत आहेत.

सलग सुट्ट्यांमुळे गर्दी

विशेषत: एक ते दोन दिवसीय सहलींना नागरिकांची पसंती असून विविध ठिकाणच्या वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत.

‘बकरी ईदनिमित्त शुक्रवारी सुट्टी, शनिवार व रविवारचा वीकेंड अशा सलग तीन सुट्टया आणि काही दिवसात शाळा व महाविद्यालये सुरु होणार असल्यामुळे नागरिक सहकुटुंब वॉटर पार्क व रिसॉर्टला येत आहेत. तसेच पाऊस जोरदार पडत असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणात फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. आमच्या रिसॉर्टजवळच कळंब समुद्रकिनारा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई, ठाणे व नाशिक येथील नागरिक मोठ्या संख्येने रिसॉर्टला भेट देत आहेत. तर अनेकांकडून रिसॉर्टच्या बुकिंगबाबत आणि सोयीसुविधांबाबत सातत्याने विचारणा होत आहे, असे नालासोपारा येथील मिनी गोवा रिसॉर्टच्या धीरज निजाई यांनी सांगितले. मात्र एप्रिल – मे महिन्यात मोठी उन्हाळी सुट्टीत नागरिक राज्याबाहेर फिरून आल्यामुळे एक दिवसीय सहलींना कमी प्रतिसाद असून वॉटर पार्क व रिसॉर्टमध्ये सर्वसाधारण गर्दी आहे, असे क्षितीज रिसॉर्टचे मालक व वसई तालुका रिसॉर्ट असोसिएशनचे मालक रामदास मेहेर यांनी सांगितले.