मुंबई : घरगुती वापरातील वातानुकुल यंत्रणेमुळे (एसी) होणारी गॅसगळती आणि गॅस भरण्यासाठी (रिफिलिंग) देशातील ग्राहकांना दरवर्षी तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा फटका बसत असून वातावरणावरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे ‘आय फॉरेस्ट’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सात प्रमुख शहरांतील म्हणजेच मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद आणि जयपूरमधील ३ हजार १०० घरांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतात वातानुकुलन यंत्रणेची मागणी झपाट्याने वाढत असून सुमारे ४० टक्के वातानुकुलन यंत्रणेत दरवर्षी गॅस भरला जातो. परिणामी २०२४ मध्ये केवळ गॅस भरण्यासाठी २७ हजार कोटीं रुपयांचा खर्च झाला आणि ५२ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन झाले. दरम्यान, योग्य ती माहिती आणि काळजी घेऊन वातानुकुलन यंत्रणेचा वापर केल्यास २०३५ पर्यंत ५०० ते ६५० दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकते, तसेच ग्राहकांचा खर्चही वाचू शकतो, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार, भारतात २०२५ मध्ये वातानुकुलन यंत्रणांची संख्या ७६ दशलक्ष असून २०३५ पर्यंत ती तिपटीने वाढून २४५ दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जवळपास ८० टक्के घरांमधील वातानुकुलन यंत्रणा ही पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी आहे. तसेच ४० टक्के यंत्रे दोन वर्षांपूर्वीची आहेत. त्यातही १.५ टन क्षमतेची यंत्रे सर्वाधिक (७४ टक्के) आहेत. ग्राहक उर्जा कार्यक्षमतेबाबत सजग असून ९८ टक्के नागरिकांकडे ३-५ रेटिंगचे एसी आहेत, तसेच ६७ टक्के कुटुंबे ते २३ अंशापेक्षा जास्त तापमानावर वापरतात.

गॅस भरण्यासंबंधी जनजागृतीचा अभाव

एसीमध्ये गॅस भरण्यासंबंधी जनजागृतीचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचे या अहवालात म्हटले आहे. परिणामी दरवर्षी ४० टक्के गॅस भरला जातो. २०२४ मध्ये ३२ हजार टन गॅस भरण्यात आला. ज्यावर ग्राहकांनी तब्बल २७ हजार कोटी रुपये खर्च केले. यामुळे ५२ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन झाले.

मुंबईची स्थिती काय

  • मुंबईत एसी असलेल्या ९५ टक्के घरांमध्ये केवळ एकच एसी आहे. तर ५ टक्के घरांमध्ये दोनपेक्षा जास्त एसी आहेत. सरासरीपेक्षा हे प्रमाण ८७ टक्क्यांनी अधिक आहे.
  • मुंबईतील २६ टक्के कुटुंबे एसी २० अंशापेक्षा कमी तापमानावर ठेवतात. जे सरासरीपेक्षा ९ टक्के आणि अन्य शहरांपेक्षा जास्त आहे.
  • ३५ टक्के कुटुंबाकडे ५ स्टार एसी आहेत.
  • मुंबईत सरासरी दररोज ३ तासापेक्षा अधिक काळ एसी वापरला जातो.

एसीच्या मागणीत वाढ

२०२० नंतर एसीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पुढील दहा वर्षांत ती तिपटीने वाढेल असे अहवालात नमूद केले आहे. पण एसीचा योग्य व्यवस्थापन व योग्य वापर न केल्यास ते वातावरणाला हानीकारक ठरु शकते असेही म्हटले आहे.