लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून रुग्णालयांतील मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिलने सहा रुग्णांमध्ये एक परिचारिका असे प्रमाण निश्चित केले आहे. मात्र असे असले तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या शंभर रुग्णांमध्ये एक किंवा दोन परिचारिका असे प्रमाण आहे. या मोठ्या तफावतीमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी रुग्णालयांच्या स्वच्छतेबरोबरच याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) पदावर रुजू झाल्यानंतर डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध रुग्णालयांना तब्बल शंभरपेक्षा अधिक वेळा भेटी दिल्या आहेत. रुग्णसेवेच्या बळकटीकरणासोबतच रुग्णालयांमधील स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे महानगरपालिका प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे. मात्र प्रशासनाने स्वच्छतेबरोबरच रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे प्रमाण व त्यातील प्रचंड तफावत याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी, अशी ही मागणी बने यांनी शिंदे सुधाकर शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.

आणखी वाचा-मुंबई: ४१ लाख रुपयांच्या अंमलीपदार्थांसह सहा जणांना अटक

मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील रुग्णसंख्याही तितक्याच झपाट्याने वाढत आहे. रुग्णालयांतील खाटा व्यापलेल्या असून एका खाटेवर दोन रुग्ण आणि खाटेच्या खाली एक रुग्ण, व्हरांड्यात जमिनीवर रुग्ण अशी स्थिती रुग्णालयांमध्ये नेहमी बघायला मिळते. त्या तुलनेत मनुष्यबळ वाढवण्यात येत नसल्यामुळे त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असून पर्यायाने मृत्युदर वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने मनुष्यबळ वाढवण्यावर भर द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार सहा रुग्णांमध्ये एक परिचारिका असे प्रमाण अपेक्षित आहे. मात्र महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांमध्ये एक किंवा दोन परिचारिका असतात. तसेच रुग्णांसाठी किती आया किंवा परिचर असावेत याचे प्रमाण मर्चंट यांच्या औद्योगिक प्राधिकरणाने १९४९ मध्ये ठरवून दिले आहे. ते महानगरपालिकेने मान्य केले आहे. मात्र त्याचे पालन होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

आणखी वाचा-पावसाळ्यातील अपघातांमुळे पायाच्या दुखापतींमध्ये मोठी वाढ!

महापालिकेच्या नायर रुग्णालयात कर्मचाऱ्यांची १,६४८ पदे असणे आवश्यक आहे. मात्र सध्या तिथे फक्त ६८८ पदे आहेत. त्यापैकी ८० पदे रिक्त आहेत. अशीच स्थिती सर्व रुग्णालयांमध्ये आहे, याकडेही बने यांनी लक्ष वेधले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेची एकूण पाच वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम), बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, डॉ. रू. न. कूपर रुग्णालय, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय यांचा समावेश आहे. या वैद्यकीय संस्थांमधील एकूण रुग्णशय्यांची संख्या ही सुमारे १२ हजार ४६२ इतकी आहे. त्याचप्रमाणे, एकूण १७ उपनगरीय रुग्णालये कार्यरत आहेत. या १७ रुग्णालयांमध्ये सुमारे ३ हजार २४५ रुग्णशय्या आहेत. याशिवाय, समर्पित पाच विशेष रूग्णालये कार्यरत आहेत. कस्तुरबा रुग्णालय, ऍक्वर्थ कृष्ठरोग रूग्णालय, मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय, क्षयरोग रूग्णालय, शेठ आत्मसिंग जेसासिंग बांकेबिहारी कान, नाक व घसा रूग्णालय यांचा समावेश आहे.