मुंबई : मुंबई महानगरपालिका, तसेच ठाणे व भिवंडी – निजामपूर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर येथील उदंचन केंद्रामधील टप्पा क्रमांक १ येथे नवीन दाबवाढ नियंत्रण टाकी (अँटी सर्ज व्हेसल) कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवार, २८ मे २०२५ रोजी सकाळी ९.४५ पासून रात्री १०.४५ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १३ तासांसाठी नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या १३ तासांच्या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
तसेच ठाणे व भिवंडी –निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांतही १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. शहर विभागातील एफ – दक्षिण विभाग, उफ – उत्तर विभागात, तसेच पूर्व उपनगरांतील टी (मुलुंड पूर्व आणि पश्चिम), एस (भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी (पूर्व), एन (विक्रोळी, घाटकोपर (पूर्व) घाटकोपर, एल (कुर्ला पूर्व), एम – पूर्व (पूर्ण विभाग), एम – पश्चिम (पूर्ण विभाग) विभाग कार्यालयाच्या हद्दीत १५ टक्के पाणीकपात लागू असणार आहे.
या परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.