मुंबईः पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) घुसखोरी करणारा बिलाल तेली (२२) तेथे २० दिवस राहिला. या काळात त्याने आयआयटीमध्ये प्रवेश करण्यासाठी २१ ई-मेल आयडीचा वापर केला. विशेष म्हणजे या मुक्कामादरम्यान तो तीन दिवस सूरतला गेला होता. चौकशीत तेलीने आपण नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्याचे सांगितले. तेथून परतल्यानंतरही तो पुन्हा पाच दिवस आयआयटीमध्ये राहिला होता. सूरत भेटीबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

ऑनलाईन अभ्यासक्रम नोंदणीच्या नावाखाली तो २७ मे रोजी आयआयटी पवईमध्ये शिरला होता. त्यानंतर तो ७ जूनपर्यंत याच परिसरात राहिला. तेथून तो सूरतला गेला होता. तेथे नातेवाईकांना भेटल्यानंतर तो पुन्हा १० जून रोजी आयआयटीमध्ये परत आला. त्यानंतर तो पाच दिवस तेथे राहिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याच्या सूरत भेटीबाबत पोलीस तपास करीत असून त्याने भेट घेतलेल्या नातेवाईकांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

या मागे घातपात असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत. आरोपी मूळचा मंगळुरू येथील रहिवासी आहे. त्या परिसरातही आयआयटीसारख्या संस्था आहेत. त्यानंतरही त्याने पवई आयआयटीध्ये घुसखोरी का केली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. गंभीर बाब म्हणजे पवई आयआयटीमध्ये ये-जा करण्यासाठी त्याने २१ ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केली आहे. यावेळी त्याने तेथील विद्यार्थ्यांशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मागील आठवड्यात १७ जून रोजी तो संस्थेच्या परिसरात आढळल्यानंतर त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र त्याच्याविरोधात किरकोळ गुन्हा दाखल करून नोटीस देऊन सोडून आले होते. मात्र हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्यावरील गुन्ह्यांच्या कलमांत वाढ करण्यात आली आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक (सीआययू) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) १७ जून रोजी बेकायदेशीरपणे संस्थेच्या व्याख्यानाला बसला होता. त्याला सुरक्षा रक्षकांनी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याने २ ते ७ जून आणि १० ते १७ जून या कालावधीतही आयआयटीच्या परिसरातील वसतिगृहात बेकायदेशीरपणे वास्तव्य केले होते. तो ४ जून रोजी पहिल्यांदा आयआयटीच्या विभागप्रमुख शिल्पा कोटीवाल यांना दिसला होता. त्याला हटकल्यावर तो पळून गेला होता. पवई पोलिसांनी १७ जून रोजी त्याच्याविरोधात बेकायदेशीरपण संस्थेच्या वास्तूत प्रवेश केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९ (३) आणि ३२९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात केवळ ७ वर्षांहून कमी शिक्षा असल्याने त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. हा प्रकार गंभीर असल्याने प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी बिलाल शेखविरोधातील कलमांत वाढ केली आहे. गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) त्याला अटक केली असून १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकही (एटीएस ) या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहे.