मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक – प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने पाच हजार विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बसमध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक, प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी भाविक, प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. यावर्षी पावसाची शक्यता असून प्रवाशांसाठी बसस्थानकावर सोयी-सुविधा उपलब्ध कराव्या, बस चिखलात अडकून पडणार नाही अशा पद्धतीने त्या उभ्या कराव्या. तसेच एसटी बसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाचीआदी व्यवस्था करावी, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा : एकदा भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते पुन्हा भूमिपूजन, गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांचा टोला

मागील वर्षी १८ लाख भाविकांचा प्रवास

मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४,२४५ विशेष बस सोडल्या होत्या. याद्वारे यात्राकाळामध्ये १८ लाख ३० हजार ९३४ भाविक, प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती.

हेही वाचा : केईएम रुग्णालयात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, केईएम ठरले देशातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची संख्या लक्षात घेता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना या चार ठिकामी तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.