मुंबई : गोराईतील बामनपाडा येथील बॉस्कोवाडी मार्गावर नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर काही महिन्यातच मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबईत गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे मुंबई महापालिकेने हाती घेतली होती. बहुतांशी कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र रस्त्यांच्या कामाबद्दल वारंवार राजकीय पक्षाकडून आरोप केले जात आहेत. रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे अधिवेशनातही वादळी चर्चा झाली होती. रस्ते कामांचा दर्जा अत्युच्च असावा यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आय.आय.टी. मुंबई) त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र तरीही रस्त्यांची कामे निकृष्ट झाली असल्याची एकेक उदाहरणे अजूनही बाहेर येत आहेत.
गोराई येथील रस्त्यावर काही महिन्यातच भेगा पडल्याचा आरोप वाचडॉग फाऊंडेशन या संस्थेने केला आहे. या प्रकरणी संस्थेचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, बॉस्कोवाडी मार्गावर स्त्याच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून त्यामुळे रस्त्याच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ वाहनचालकांनाच नव्हे तर पादचाऱ्यांनाही धोका आहे. रस्त्याच्या पृष्ठभागाची झपाट्याने होत असलेली झीज लक्षात घेता, भविष्यात आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्याचे मत गॉडफ्रे यांनी व्यक्त केले आहे.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यातच या भेगा पडल्यामुळे वापरलेले बांधकाम साहित्य अथवा पद्धती मानकांनुसार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी गॉडफ्रे यांनी केली आहे. रस्ता दोष दायित्व कालावधीत (Defect Liability Period) असल्याने संबंधित ठेकेदाराचे बील अदा करू नये व आवश्यक तेवढी रक्कम मुंबई महापालिकेने अनामत रकमेतून वसूल करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच अशा ठेकेदारास भविष्यात कोणताही नवीन कामाचा ठेका देण्यात येऊ नये, अशीही सूचना केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून खड्डेमुक्त रस्ते तयार करण्याचे ध्येय ठेवून, सिमेंट काँक्रिट रस्ते तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. काँक्रिट रस्ते डांबराच्या रस्त्यांपेक्षा अधिक काळ टिकतात. ते अवजड वाहतुकीला आणि हवामानातील बदलांना जास्त चांगले तोंड देतात. एकदा का काँक्रिट रस्ता तयार झाला, तर त्याची देखभाल दुरुस्ती करायचा खर्च फार कमी असतो आणि वेळोवेळी दुरुस्तीची गरजही कमी भासते. मुंबईतील भौगोलिक स्थिती, पर्जन्यमान, वाहतुकीचा भार इत्यादी बाबी लक्षात घेता डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंट काँक्रिटचे रस्ते हा अधिक चांगला पर्याय ठरतो आहे. मात्र सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.