मुंबई : सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाने(एआययू) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी केलेल्या कारवाईत थायलंडहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांना अटक करण्यात आली. आरोपींकडे १२१ दुर्मिळ वन्यप्राणी सापडले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्राणांना मूळ देशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
एआययूच्या कारवाईत आरोपींकडे दोन सुमात्र पट्टेदार ससे, ठिपकेदार एक कस्कस, सरडा (तीन जीवंत, एक मृत), ११५ ग्रीन इगुआना सापडले आहेत. कुस्कस आणि ग्रीन इगुआना हे प्राणी संरक्षित प्रजातींमध्ये समाविष्ट आहेत. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सर्व प्राण्यांची देखभाल केली जात आहे. याबाबत आवश्यक परवानग्या घेऊन सर्व प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्यात येणार आहे. या प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोन भारतीय प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपी बँकॉकहून भारतात आले होते. आरोपींविरोधात सीमाशुल्क कायदा, १९६२ आणि वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय तस्करांचा सहभाग असल्याचा सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याचे धागेदोरे बँकॉकपासून आफ्रिका खंडांतील देशांपर्यंत पोहोचले आहेत. वन्यजीव तस्करीप्रकरणी इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी
दरवर्षी थायलंडमधील बँकॉकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यंटक जात-येत असतात. त्याचाच फायदा घेऊन त्या मार्गावरून तस्करीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दुर्मिळ प्राण्यांसह हायड्रोपोनिक गांजाचीही मोठ्या प्रामाणात तस्करी केली जाते. दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. सहा महिन्यांत १०० कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत थायलंडमधील भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये बँकॉकहून भारतात दुर्मिळ प्राण्यांच्या तस्करीतही वाढ झाली आहे. अनेक कारवायांमध्ये सीमाशुल्क विभागाने अशा प्राण्यांची सुटका केली आहे.