मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर सांबराच्या शिंगांची विक्री करणाऱ्या तिघांना वन विभागाने अटक केली. या तिघांकडून सांबराची शिंगे जप्त करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ही शिंगे आरोपींनी कुठून आणली याचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून आतिश कुंचिकोर्वे, अन्वर हुसेन शेख आणि हर्षल शेट्ये अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते धारावी येथील रहिवासी असल्याचे समजते. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना वन विभागाच्या कोठडीत पाठवले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार शिंगासह वन्यजीवांच्या शरीराचा कोणताही भाग खरेदी वा विक्री करणे किंवा बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते.
प्रथम दर्शनी ही शिंग सांबराची असल्याचे सांगितले जात आहे. ही शिंग पुण्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. काही दिवसांतच याबाबत सविस्तर माहिती प्राप्त होईल, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ही शिंगे जंगलातून गोळा करून त्यांची विक्री करत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मात्र, वनविभाग याबाबत आणखी चौकशी करत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात अशा प्रकारच्या तस्करीच्या अनेक घटना घडत असल्याने वन विभाग अधिक सतर्क झाले आहे.
तस्करी कशासाठी
- शिंगाचा वापर ट्रॉफी किंवा सजावटीच्या वस्तूंसाठी केला जातो. काहीजण त्याचा वापर घरात शोपीस म्हणून करतात.
- सांबर शिंगाना मोठी मागणी आहे. त्यामुळे तस्कर ही शिंगे गोळा करून काळ्या बाजारात विकतात.
- काही टिकाणी शिंग वापरून चाकू, मूर्ती किंवा अन्य हस्तकला वस्तू बनवल्या जातात.
शिंगे काढण्याची पद्धत
- बहुतांश सांबर आणि काही हरणांची शिंगे हंगामानंतर नैसर्गिकरित्या गळून पडतात. ही शिंगे जंगलात सापडतात.
- गळून पडलेली सांबर शिंग गोळा करण्यास भारतात परवानगी दिली जाता नाही.
- अनेकदा तस्करांकडून प्राण्याची हत्या करून अवैध्यपणे शिंगे काढली जातात.
- काही वेळा प्राण्यांवर हल्ला करून त्यांची शिंगे जबरदस्तीने कापली जातात.