मुंबई: मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराप्रकरणात अभिनेता डिनो मोर्याची सोमवारी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. अभिनेता डिनो मार्या शिवसेनेचे (ठाकरे गट) युवानेते व आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता डिनो मोर्याला समन्य बजावले होते. त्याअंतर्गत त्याला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार तो सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात चौकशीला उपस्थित राहिला. त्याची चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
काय आहे प्रकरण ?
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील वीस वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या काळात एकूण १८ कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. त्यापैकी अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत.
आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाखांंचे नुकसान केल्याचा आरोप आहे.ईडीकडूनही प्राथमिक चौकशीयाप्रकरणाचा तपास विशेष पथक करीत आहे. याप्रकरणी ईडीनेही उडी घेतली असून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यात व्यवहारांची पडताळणी सुरू असून त्यात ठोस माहिती मिळाल्यास याप्रकरणी एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट (ईसीआयआर) दाखल करण्यात येईल. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विधान परिषदेत याप्रकरणी चौकशीची घोषणा करण्यात आली होती. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी ही मागणी केली होती.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला (ठाकरे) लक्ष्य करण्यासाठी हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कंत्राटाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका व एमएमआरडीएशी संपर्क साधला असून कंत्राटाच्या तपशिलांची मागणी केली आहे. मिठीच्या उगमस्थळापासून पवई ते कुर्ला दरम्यानच्या ११ किमी ८४० मीटर लांबीच्या नदीच्या सफाईची जबाबदारी महापालिकेची, तर उर्वरित ६ किमी ८०० मीटर लांबीच्या नदीच्या सफाईची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. पोलिसांच्या चौकशीत या संपूर्ण कामांसाठी आतापर्यंत एकूण १८ कंत्राटदार नेमण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील पाच कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.