मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सोमवारी ३४ नवे रुग्ण सापडले. यामुळे रुग्णांची संख्या २ हजार ४१ वर पोहोचली. तर मुंबईतील रुग्णांची संख्या ८६३ इतकी झाली आहे. तसेच मुंबईमधील एका करोनाबाधित रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहे.
राज्यामध्ये सोमवारी सापडलेल्या ३४ रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील १२ रुग्णांचा समावेश आहे. त्याखालोखाल छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत सात, नवी मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सातारा, सांगली महानगरपालिका, नागपूर, अमरावती जिल्हा व अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मुंबईमध्ये सोमवारी मृत्यू झालेला रुग्ण ४४ वर्षीय महिला असून, तिला यकृताचा त्रास होता. या महिलेच्या मृत्युमुळे राज्यातील मृतांची संख्या २९ वर पोहचली आहे.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण २१ हजार ९५१ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी २ हजार ४१ जण बाधित आढळले आहेत. आतापर्यंत १५०० रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.४९ टक्के इतके आहे. राज्यामध्ये सध्या ५१२ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.