लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूद्ध न्यूझीलंड संघामध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीतील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होत असताना मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर धमकी देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये बंदुक, ग्रेनेड व काडतुसचे छायाचित्र असून सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे.

देशात सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ स्पर्धा ही अतिम टप्प्यात आली असून आज (१५ नोव्हेंबरला) भारत विरुध्द न्युझीलंड या दोन संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करून धमकी देण्यात आली आहे. संबंधित ट्वीट मंगळवारी रात्री प्राप्त झाले आहे. या ट्वीटमध्ये छायाचित्र असून त्यात बंदुक, हँडग्रेनेड व काडतुस आहे. या छायाचित्राखाली भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांच्या ट्वीटर सेलने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली असून त्यानंतर गुन्हे शाखा व इतर विभागांना याबाबत कळवण्यात आले आहे.

आणखी वाचा-वानखेडे स्टेडिअमवर गाड्या आणि ‘या’ वस्तूंना नो एन्ट्री, IND vs NZ साठी पोलिसांनी सांगितले नियम

या प्रकरणाशिवाय गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यांवर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांशीही दोन हात करावे लागतात. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.