मुंबई : परदेशी जाऊन जैवतंत्रज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर उद्योग क्षेत्रातील नोकरीची आस न बाळगता मुंबईकर प्रसाद शिंदे याने वनसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. देशात तो दहाव्या स्थानावर आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून लोकसेवा, परदेशसेवा यांप्रमाणेच वनसेवा परीक्षा घेण्यात येते. यंदा एकूण ८८ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. डिसेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल
जाहीर झाला होता. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेत राज्यातील दहा ते बारा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या परीक्षेत मुंबईतील प्रसाद शिंदे हा देशात दहावा आला आहे. मुंबईतील भवन्स महाविद्यालयातून त्याने जैवतंत्रज्ञान विषयातील पदवी घेतली. त्यानंतर आर्यलड येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. ‘भारतात आल्यावर लोकसेवा परीक्षांची माहिती घेत असताना वनसेवेबद्दल कळले. मला मुळात या विषयाची आवड होती. त्यात आदिवासी भागांसाठी काम करण्याचीही संधी असते. फिरण्याचीही आवड आहे. त्यामुळे ही परीक्षा देण्याचे मी ठरवले. नोकरीपेक्षा लोकांसाठी काही काम करावे अशी माझी पूर्वीपासूनच इच्छा होती,’ असे प्रसाद याने सांगितले.