मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी-सुविधेचा प्रकल्प रखडणार याची दक्षता घेत पुढील तीन वर्षांत बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

ठाणे- बोरिवली दुहेरी बोगदा हा ११. ८४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे बोगद्यात हवा खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी. प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वन विभागाची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी, रात्री काम करण्याची परवानगी घेण्यात यावी. बोरिवली बाजूकडील काम गतीने पुढे जाण्यासाठी आणि या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून एक महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.

यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सबंधित अधिकाऱ्याने एक महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करावे. बोरिवली बाजूकडील अदानी, टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करावे. तसेच भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याचे अंतिम नियोजन द्यावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी डिसेंबर २०२८ची मुदत

ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा ११.८४ किलोमीटर लांबीचा आहे. सध्याच्या रस्त्याने ठाणे ते बोरिवली जायला एक ते सव्वा तास लागतो. बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी१५ मिनिटांवरती येणार आहे. हा प्रकल्प दोन टप्यात उभारण्यात येणार आहे. बोरिवली बाजूने ५.७५ किलोमीटरचा टप्पा एक आणि ठाणे बाजूने ६.०९ किलोमीटर टप्पा दोन असणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १२ हजार ५७ कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे.