कविता, गाणी आणि पटकथेच्या ‘शब्दप्रभू’शी सुसंवाद

कविता, गाणी, शेर-शायरी, पटकथेचे ‘शब्दप्रभू’ आणि आपल्या लेखणीची  रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर मुक्त गप्पा मारण्याचा योग ‘लोकसत्ता’ने जुळवून आणला आहे. श्रोते आणि जावेद अख्तर यांच्यातील संवादाचा दुवा सांधण्याचे काम अभिनेते व कवी किशोर कदम ऊर्फ सौमित्र करणार आहेत.

‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता गप्पा’ हा कार्यक्रम शनिवार, ७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.  झी २४ तास या कार्यक्रमाचे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. खास निमंत्रितांसाठी असलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनाही जावेद अख्तर यांच्याशी संवाद साधता येणार आहे. नव्या वर्षांतील ‘लोकसत्ता गप्पा’ची ही पहिली मैफल श्रोत्यांसाठीही अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. या सगळ्यांविषयी त्यांचे विचार उपस्थितांना समजून घेता येणार आहेत.

हिंदी व उर्दू भाषेतील ख्यातनाम गीतकार व पटकथा लेखक अशी जावेद अख्तर यांची विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, तर ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

वाचकांना नियमित वृत्तव्यवहारापेक्षाही आगळे देण्याचा आणि सकस विचारांची सफर घडवण्याचा ‘लोकसत्ता’चा नेहमीच प्रयत्न असतो.

कोणत्याही संस्कृतीला तिच्यात निर्माण होणाऱ्या साहित्य, संगीत व कलांमुळे आकार प्राप्त होत असतो. आपल्या कर्तृत्वाने एखाद्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविलेल्या दिग्गजांचे एक व्यक्ती म्हणून असणारे भावविश्व, विविध विषयांवरील त्यांचे विचार, मते जाणून घेणे तसेच श्रोत्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आदी बाबी विविध क्षेत्रांतील निमंत्रित मान्यवरांच्या साक्षीने ‘लोकसत्ता गप्पां’मधून उलगडल्या जातात.

  • ‘लोकसत्ता गप्पा’चे पहिले पुष्प ज्येष्ठ कन्नड कादंबरीकार एस. एल. भैरप्पा तर दुसरे पुष्प ज्येष्ठ गायक व संगीतज्ञ पं. सत्यशील देशपांडे यांच्या गप्पांनी रंगले होते. आता जावेद अख्तर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.