राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१० जून) दिल्लीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्. यानुसार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. विशेष म्हणजे यामध्ये अजित पवारांचं नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच अजित पवारांवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

जयंत पाटील म्हणाले, “राजी नाराजीचा प्रश्न येत नाही. सगळीकडे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. प्रसारमाध्यांनीही आमच्या या आनंदात,उत्साहात सहभागी व्हावं.”

“आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न”

“अजित पवारांच्या उपस्थितीत हे निर्णय दिल्लीत झाले. अजित पवार कार्यक्रम संपल्यावर निघून आले. शेवटी हे सर्व निर्णय सर्वांच्या उपस्थितीत झाले आहेत. त्यामुळे त्यावर शंका-कुशंका उपस्थित करण्याला जागा नाही. असं असूनही शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. याचा अर्थ आमच्या पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

“अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही. आम्ही एकमतानेच दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील हे निर्णय घेतले आहेत,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.

“या निवडून शरद पवारांनी त्यांचा उत्तराधिकारी नेमला आहे का?”

सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करणार असल्याच्या चर्चांनंतर आता त्यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर शरद पवारांनी आपला राजकीय उत्तराधिकारी निवडला आहे की काय असा प्रश्न विचारला जातो आहे. याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, “राज्यस्तरावर काम करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिने राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नावर उत्तर देणं योग्य नाही. असं असलं तरी आमच्या पक्षाचं राष्ट्रीय स्तरावर जे स्थान होतं, ते संकटात आलं होतं.”

हेही वाचा : VIDEO: “तुमचा दाभोलकर करू”, जीवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “याची जबाबदारी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांनी सर्वांना जबाबदाऱ्या देऊन कामाला लावलं”

“शरद पवारांनी या सर्वांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन कामाला लावलं आहे.वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर दिली आहे. यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळेल यासाठी आमचा पक्ष प्रयत्न करतो आहे,” असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं.