अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यानंतर थेट जनतेत जाण्याचा निर्णय घेतला, तर अजित पवार गटाने थेट पक्षावरच दावा केला. यानंतर अजित पवारांच्या गटाने शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारणा केली असता ते भावूक झाले. यावर बोलताना आव्हाडांना अश्रू अनावर झाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “३५ वर्षात मला काहीही मिळालेलं नाही. असं असूनही मी माझ्या बापाबरोबर आहे. शरद पवार अशा अनेक लढाया लढले आहेत. जेव्हा जेव्हा शरद पवारांना घेरण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा ते या घेऱ्यातून बाहेर येऊन आणखी मजबूत झाले आहेत. अशावेळी मी भावूक होणारच ना. त्या माणसाला प्रचंड त्रास होत आहे.”

“शरद पवारांनीच उभं केलं त्यांनीच असं काम केलं”

“ज्या लोकांना शरद पवारांनीच उभं केलं त्यांनीच असं काम केलं. तिकडे बसून आज जे लोक बोलत आहेत त्यांच्या आयुष्यात सुवर्ण क्षण आणणारा व्यक्ती शरद पवारच आहे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : विश्लेषण : राष्ट्रवादीमध्ये कायदेशीर लढाई अपरिहार्यच? विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला? 

“शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसण्यात आला का?”

शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसण्यात आला का? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी सावध भूमिका घेतली. शरद पवारांच्या पाठित खंजीर खुपसला असं मी म्हणणार नाही. मात्र, काय होत आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, असं मत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केलं. तसेच लोकशाहीत जनताच उत्तर देते. लोकशाहीत जनतेकडेच जावं लागतं, असंही नमूद केलं.

“परत आले तर अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?”

“परत आले तर अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का?” या प्रश्नावर जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांना ज्यांना पक्षात घ्यावं वाटतं त्यांना ते घेतील. त्या निर्णयाशी माझं देणंघेणं नाही, असं म्हटलं.

हेही वाचा : Maharashtra Political News Live : “राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराने पत्र देत शरद पवारांना एकटं सोडू म्हटलं”, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट, वाचा प्रत्येक अपडेट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला दुःख याच गोष्टीचं आहे की, त्यांचं वय ८४ वर्षे आहे आणि…”

“मला दुःख याच गोष्टीचं आहे की, त्यांचं वय ८४ वर्षे आहे. ते २००९ पासून सत्तेत नाहीत. मात्र, तिकडे गेलेल्या प्रत्येकाला खुर्ची मिळावी म्हणून शरद पवार लढले. आज तेच लोक शरद पवारांची खुर्ची हिसकावत आहेत. ज्या माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यालाच हे लोक सांगत आहेत की, पक्ष आमचा आहे,” असं सांगत आपलं दुःख व्यक्त केलं.