मुंबई : नाईक नगर सोसायटीत राहणाऱ्या आपल्या मित्राला भेटायला डोंबिवलीहून आलेले तीन तरुण सोमवारी रात्री घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत. हे तरुणही कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. नाईक नगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या मजुरांपैकी एक जण मंगळवारी गावी जाणार होता. त्याला निरोप देण्यासाठी म्हणून डोंबिवलीला राहणारे त्याचे मित्र अनुपकुमार गौड, अनुपकुमार यादव आणि अन्य एक जण सोमवारी रात्री नाईक नगर सोसायटीत आले. ‘हे तिघेही माझ्याकडे काम करतात. ते कधी परतणार हे विचारण्यासाठी मी रात्री नऊ वाजता त्यांना फोन केला होता. तेव्हा आम्ही उद्या सकाळी येतो, असे त्यांनी सांगितले. पण रात्रीच होत्याचे नव्हते झाले,’ अशी प्रतिक्रिया हे तिघे काम करत असलेल्या आस्थापनाचे मालक दिलीपकुमार यांनी सांगितले. या तिघांपैकी एकाच्या पत्नीने सकाळी दिलीपकुमार यांना फोन केल्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता इमारत दुर्घटनेबद्दल त्यांना समजले. या तिघांपैकी एकाचा फोन वाजत असल्याने त्याच्या नातलगांच्या जिवात जीव आला होता. मात्र, तो फोन राजावाडी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाकडे होता. प्रत्यक्षात या तिघांचे काय झाले, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही.