मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत त्यांनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. केंद्र आणि राज्यातील विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महायुती म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेले पाहिजे असे सांगून शिंदे यांनी बिहारमध्ये एनडीए निश्चितच बहुमताने विजय मिळवेल असा दावा केला. मुंबई, ठाणे आणि महानगर प्ररदेशात बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना, या निवडणुका स्थानिक पातळीवर असतात. सर्वच कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतू अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्त्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. मिठाचा खडा पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना धंगेकरांना स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास स्वतः त्यांच्याशी बोलेन असे शिंदे यांनी सांगितले.
