मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होती. तर, रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने, मुंबईतील विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. पावसामुळे रेल्वेमार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने, लोकल विलंबाने धावत आहेत.
पश्चिम, मध्य रेल्वेवरील लोकल धीम्यागतीने धावत असल्याने नोकरदारांना कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दादर, कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, वांद्रे, अंधेरी, बोरिवली येथे जोरदार पाऊस पडत आहे. रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग कमी करण्यात आला. परिणामी, लोकल कूर्मगतीने धावण्यात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल १० ते २० मिनिटे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल ५ ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकल प्रचंड विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांचा खोळंबा झाला. लोकल उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. तर, मेल, एक्स्प्रेस कूर्मगतीने धावत असल्याने,लोकलचे वेळापत्रक आणखी बिघडले आहे.