२०१४ तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ
लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा मतदारसंघात यंदा झालेल्या मतदानाची टक्केवारी २०१४च्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले असले तरी, प्रत्यक्षात गतवेळच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांच्या संख्येत दोन लाखांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, या पाच वर्षांच्या काळात मुंबईतील मतदारांच्या संख्येत जवळपास तीन लाखांची घट झाल्याची नोंद आहे.
मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात यंदा एकूण ९६ लाख, ४१ हजार ३३८ मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ५३ लाख ३२ हजार ३३३ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. २०१४च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या ९९ लाख ५९ हजार ६६० इतकी असताना प्रत्यक्षात ५१ लाख १ हजार १७४ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. संपूर्ण मुंबईतील मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांत घटलेली असली तरी यंदा प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. अपवाद फक्त दक्षिण मुंबईचा ! केवळ दक्षिण मुंबईतील मतदार वाढलेले असताना या मतदार संघातील मतदान मात्र कमी झाले आहे.
२०१४ च्या ५१.६ टक्के मतदानाच्या तुलनेत यंदा मुंबईत ५५.२ टक्के मतदान झाल्याचे आकडे पहिल्या दिवशी समोर आले. ही टक्केवारी सुमारे चार टक्क्य़ांनी वाढल्याचे दिसून येते. अर्थात प्रत्यक्ष मत देणाऱ्यांची संख्या तितकीही फुगलेली नाही. शहर आणि उपनगरातील मतदार याद्यांची गेल्या पाच वर्षांत पडताळणी करण्यात आली. पाच वर्षांत निधन झालेल्या, पत्ता बदललेल्या किंवा ज्यांची नावे दोनदा आली आहेत, अशी नावे वगळून या याद्या अद्ययावत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदारांची संख्या सव्वा तीन लाखांपर्यंत घटली. सन २०१४ मध्ये सहा मतदार संघात मिळून ९९लाख, ५९ हजार , ६६० मतदार होते. तर ती संख्या आता घटली असून सन २०१९ मध्ये ती ९६ लाख, ४१ हजार ३३८ झाली आहे. मतदार घटल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली असाही सूर उमटत होता. मात्र मुंबईकरांनी यावेळी मोठय़ा उत्साहाने मतदान केल्यामुळे प्रत्यक्ष मतदारांचा आकडाही वाढल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
इतर शहरांच्या तुलनेत मुंबई मागेच
- दिल्ली – ६५.१ टक्के
- बंगळुरू – ५५.३ टक्के
- चेन्नई – ६१.८ टक्के
- कोलकाता – ६७.५ (उत्तर), ७०.२ (दक्षिण) (२०१४ची टक्केवारी)