मुंबई : महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाची मंगळवारी जाहीर होणारी उमेदवार यादी वंचितच्या भूमिकेमुळे आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीला वंचितने साथ दिल्यास त्यांना चारऐवजी आता पाच जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. वंचितचा महाविकास आघाडीत समावेश न झाल्यास ठाकरे गट -२२, काँग्रेस -१७, आणि राष्ट्रवादी शरद पवार गट- ९ असे जागावाटप झाल्याचे समजते. ठाकरे गट सात जागांवरील उमेदवारी नंतर जाहीर करणार असून बुधवारी १५ उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. दक्षिण मुंबई (अरविंद सावंत), मुंबई उत्तर पश्चिम (अमोल कीर्तिकर), ठाणे (राजन विचारे), रायगड (अनंत गीते), रत्नागिरी-सिंधुदुर्ग ( विनायक राऊत), सांगली (चंद्रहार पाटील), उस्मानाबाद (ओमराजे निंबाळकर) यांची उमेदवारी ठाकरे गटाने यापूर्वी निश्चित केली आहे. हेही वाचा >>> रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा शरद पवार गटाची आज बैठक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची बुधवारी केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे. तसेच निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या विविध समित्यांचे गठन आणि निवडणूक जाहीरानामासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असणार आहेत. बैठकीला पक्षाचे केंद्रीय संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित असतील. चळवळीला लाचार करणे मान्य नाही : आंबेडकर मुंबई : युतीमध्ये व्यक्तिगत वाद, हेवेदावे येऊ दिले नाहीत, परंतु चळवळीला लाचार करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आपण ते मान्य करणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. राज्यातील फुले आंबेडकरी मतदारांना त्यांनी पाठिंब्यासाठी आवाहन केले आहे, त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे स्वबळावर लढण्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे. प्रकाश आंबेडकर उद्या पक्षाची आघाडीबाबतची भूमिका जाहीर करणार आहेत. वंचित आघाडीचा प्रस्ताव मान्य करावा : पटोले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाबंसंधी दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे, आता आघाडीतील अन्य पक्षांनी त्यांचा प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सांगली व भिवंडी या दोन मतदारसंघांवरून जो महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला आहे, त्याबद्दलही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असे पटोले यांनी म्हटले आहे.