मुंबई : लोकल प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना निरनिराळ्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. मात्र, भल्यापहाटे लोकल प्रवासात 'मोदी की गॅरंटी' या कर्णकर्कश जाहिरातीमुळे प्रवाशांची झोपमोड होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना व्यत्यय येत आहे. त्यामुळे या कानठिळ्या बसवणाऱ्या जाहिराती प्रवाशांना नकोशा झाल्या आहेत. केंद्राच्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता भारतीय रेल्वेचा पुरेपूर वापर केला जात आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'थ्रीडी सेल्फी बूथ' आणि 'थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स' उभारण्यात आले होते. याद्वारे 'डिजिटल इंडिया', 'स्कील इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया' अशा विविध योजनांची जाहिरातबाजी केली आहे. मात्र या बुथ आणि सेल्फी पाॅइंट्सच्या ठिकाणी कुत्रे, मांजर घाण करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. सफाई कर्मचाऱ्यांना हा परिसर स्वच्छ करण्यास अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत. तसेच काही प्रवासी बूथच्या ठिकाणी तासनतास बसून राहिल्याने इतर प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण होत आहे. आता भल्या पहाटे रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात 'मोदी की गॅरंटी' आयुष्मान कार्ड भारत प्रधानमंत्री जन-आरोग्य योजनेची जाहिरात केली जात आहे. हेही वाचा - अजित पवारांचे बंधू सुप्रिया सुळेंच्या प्रचारात, श्रीनिवास पवार यांच्याकडे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दूरवर राहणारे अनेक जण सकाळी कामावर वेळेत पोहोचण्यासाठी रात्री ३ वाजता उठून पहाटेची लोकल पकडतात. लोकल प्रवासात काहीजण डुलकी घेत असतानाच अचानक मोठ्या आवाजात जाहिरात सुरू होते. प्रवाशांना 'मोदी की गॅरंटी' आयुष्मान भारत जाहिरात पहाटेच्या सुमारास कसारा - सीएसएमटी वारंवार ऐकवली जाते. प्रवासी तिकीट काढून प्रवास करत असताना त्याला योग्य सुविधा मिळत नाहीत. याबाबत तक्रार करण्यास गेल्यास, रेल्वे प्रशासन एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे पाठवते, असे एका प्रवाशाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. लोकलमध्ये केली जाणारी उद्घोषणा प्रवाशांच्या सोयीसाठी असते. उद्घोषणेचा आवाज कमी केल्यास प्रवासीभिमुख माहिती ऐकू येत नाही.- डाॅ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे हेही वाचा - विदर्भात तीन दिवस पावसाचे 'मोदी की गॅरंटी' जाहिरात रेल्वे प्रवाशांना डोकेदुखी बनली आहे. मोठ्या आवाजातील ही जाहिरात रेल्वे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अचानकपणे येणाऱ्या आवाजामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासीभिमुख माहितीचा आवाज कमी आणि जाहिरातीचा आवाज मोठा असतो. त्यामुळे कर्णकर्कश आवाजातील जाहिराती तत्काळ बंद कराव्या. - उमेश विशे, सचिव, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन