दुरुस्तीचे काम लांबल्याने पादचाऱ्यांसाठी पूल खुला करण्यास विलंब

मुंबई : पालिकेने सुरू केलेले दुरुस्तीचे काम सायंकाळपर्यंत लांबल्याने शुक्रवारीही लोअर परळचा पूल पादचाऱ्यांकरिता खुला होऊ शकला नाही. शनिवार सकाळपासून हा पूल पादचाऱ्यांकरिता पूर्णपणे खुला होईल, अशी अपेक्षा आहे.

पूल बंद झाल्यापासून पादचाऱ्यांच्या हालांना पारावार राहिला नव्हता. पालिकेच्या सांगण्यावरून रेल्वेने पुन्हा पाहणी करून पुलाचा काही भाग पादचाऱ्यांकरिता खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी हा पूल पादचाऱ्यांकरिता खुला होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले  होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. पुलाच्या ज्या भागावरून जाण्यास पादचाऱ्यांना मुभा देण्यात आली होती, त्या भागाची दुरुस्ती करण्यासाठी सायंकाळ उजाडल्याने पादचाऱ्यांना पर्यायी मार्गावरील गर्दीतूनच वाट काढावी लागली.

रेल्वे, महानगरपालिका आणि आयआयटी तज्ज्ञांच्या संयुक्त पाहणीनंतर लोअर परळ  पूल  संरचनात्मक दृष्टय़ा धोक्याचा आढळल्याने मंगळवारी पहाटेपासून हा पूल अचानक बंद करण्यात आला होता. मात्र पूल बंद झाल्याने लोअर परळ  स्थानकात उतरणाऱ्या सुमारे दोन लाख प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पादचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी पूर्वेकडील  पुलाचा काही भाग पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने गुरुवारी पाहणी केली. या पाहणीनंतर पदपथाचा भाग धोकादायक स्थितीत आढळून आल्याने पुलाच्या मधल्या भागातून पादचाऱ्यांना जाण्याची मुभा देण्यात आली. शुक्रवार सकाळपासून पूल खुला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी लोअर परळ स्थानकातून बाहेर पडणाऱ्या पादचाऱ्यांना या पुलाचा वापर करता आला नाही.पादचाऱ्यांसाठी पूल खुला करुन देण्यापूर्वी पालिका कर्मचाऱ्यांनी त्यावर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. पुलाचा भाग सुरू करण्यात येणार असला तरी रेल्वे रुळांवरील भाग बंदच करण्याच्या निर्णय घेतल्याने त्या ठिकाणी लोखंडी पत्र्यांचे अडथळे कर्मचाऱ्यांना लावावे लागले. शिवाय पदपथदेखील धोकादायक स्थितीत असल्याने त्या ठिकाणी मार्गरोधक लावण्यात आले आहे. शिवाय पुलावर दुचाकी वाहने येऊ नयेत यासाठी सुरुवातीला स्टीलचे खांब लावण्यात आले. ‘शुक्रवारी पूल सुरू होणार असल्याचे समजले होते. मात्र सकाळी या ठिकाणी आल्यावर पुलाच्या दुरुस्तीचे कारण देत रेल्वे पोलिसांनी दत्ता अहिरे मार्गाचाच वापर करण्याचे सांगितले,’ असे पादचारी मोहन नाईक यांनी सांगितले.