मुंबई : तुळजापूर, अष्टविनायक मंदिरे, श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान याबरोबरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळांचे जतन व संवर्धन विकासासाठी राज्य शासनाने सुमारे तीन हजार कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिली. या संदर्भातील शासकीय आदेश बुधवारी जारी करण्यात आले.
अर्थसंकल्पात या मंदिरांच्या विकासाची तरतूद करण्यात आली होती. याच महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्थळाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने शासन निर्णय जारी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. या सर्व कामांचे अजित पवारांना श्रेय मिळेल याची खबरदारी घेण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यात मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी १८६५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अष्टविनायक गणपती मंंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकासासाठी १४८ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मोरगाव, थेऊर, ओझर, रांजणगाव, महड, पाली, सिद्धटेक मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विकास करण्यात येणार आहे. मोरगाव (८ कोटी), थेऊर (७ कोटी, २१ लाख), ओझर (७ कोटी, ८४ लाख), रांजणगाव (१२ कोटी), महड (२८ कोटी, २४ लाख), पाली (२७ कोटी), सिद्धटेक (१० कोटी) तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा मंदिराच्या २६० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या विकास आराखड्यात मंदिर संवर्धन व दुरुस्ती, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती, डोंगरावरील पायवाटांचे सुशोभीकरण अशा विविध कामांचा त्यात समावेश आहे. ही कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथे हे स्मृतीस्थळ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी ६८१ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.
कोणत्या मंदिरासाठी किती तरतूद
श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा – १८६५ कोटी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळ – ६८१ कोटी
अष्टविनायक विकास आराखडा – १४८ कोटी
श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखडा – २६० कोटी