विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. १७ ते २५ ऑगस्टदरम्यान झालेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोनल सुरू असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. मात्र, यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येणार आहे. हेही वाचा - “अधिवेशनात सरकारकडून अनेक आश्वासनं, मात्र….”; आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका ''या अधिवेशनात ६ बैठका, एकूण कामकाज ५७ तास २५ मिनिटं, अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ निरंक, रोजच्या कामकाजाचे तास सरासरी ९ तास २५ मिनिटे, एकूण प्रश्न ४ हजार ८१५, स्वीकृत प्रश्न २५१, सभागृहात उत्तरीत झालेले प्रश्न २२, लक्षवेधी सूचना ८६२, नियम ५७ च्या सूचना २२, संमत करण्यात आलेली विधेयकं १०, विधान परिषदेत एकही विधेयक संमत करण्यात आले नाही. नियम २९३ अन्वये २ मुद्दे चर्चेत आले. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर ११ मुद्दे उपस्थित करण्यात आले'', अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली. हेही वाचा - “तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसमोरच सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ किस्सा दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिवेशन काळात विधानभवन परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी एका समितीचे गठन करण्याचे निर्देश दिले. या समितीत विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, प्रविण दरेकर, अनिल परब, अमर राजूरकर, शशिकांत शिंदे, जयंत पाटील(शेकाप), कपिल पाटील यांचा समावेश असणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे घेण्यात यावे, अशी शिफारस सभागृहानं राज्यपालांना केली असल्याची महिती विधानसभा अध्यक्षांनी दिली.