मुंबई : भाजपने राज्यातील उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची नावे अखेर जाहीर केली आहेत. अंतर्गत मतभेद आणि स्थानिक वाद मिटविल्यानंतर भाजपने ही नावे जाहीर केली आहेत. भाजपने दोन आठवड्यांपूर्वी ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. मात्र उर्वरित जिल्ह्याध्यक्षांची यादी रखडली होती.

मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह काही केंद्रीय पातळीवरील नेत्यांची चर्चा झाल्यावर उर्वरित नावे निश्चित करण्यात आली आहेत. पहिली यादी जाहीर झाल्यावरही काही जिल्ह्यांमध्ये या पदासाठी इच्छुक व अन्य नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यामुळे उर्वरित नावे निश्चित करण्याआधी पुन्हा स्थानिक नेते, आमदार-खासदार आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण केली आहे. निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, यादृष्टीने सर्व संबंधितांशी प्रदेश पातळीवरून समन्वय साधण्यात येत आहे. काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांमुळे पक्षात नाराजीची भावना निर्माण झाली आहे. मुंबईतही काही नावांना विरोध झाला आहे.