आरेचा निर्णय त्यांनी बदलला याचं मला दु:ख झालं असल्याचं सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझा राग मुंबईवर काढू नका असं आवाहन नव्या सरकारला केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला आवाहन केलं. दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो कारशेड आरेतच !; नव्या सरकारचा ठाकरे यांच्याविरोधात पहिला निर्णय

बहुचर्चित कुलाबा- वांद्रे-सिप्झ मेट्रो-३चे कारशेड आरे वसाहतीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे.

Eknath Shinde CM: “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही,” उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; अमित शाह यांना केली विचारणा

“मतदारांच्या मताचा बाजार…,” उद्धव ठाकरेंनी जाहीर केली नाराजी; म्हणाले “लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज”

एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जनतेच्या हिताचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न आहे. जनतेच्या पैशांचा गैरवापर होता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचेच निर्णय हे युतीचं सरकार घेईल”. दरम्यान उद्या सर्व आमदार मुंबईत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून बहुमताचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत –

आरेच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी रात्रीस खेळ चाले हे त्यांचं ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला. “आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. मला दु:ख झालंय ते म्हणजे माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याने मला दुख झालं आहे. रात्रीस खेळ चाले, हे त्यांचं आता ब्रीदवाक्य आहे. एका रात्रीत आरेमध्ये झाडांची कत्तल झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याला कांजूरमार्गचा पर्याय सुचवला. कामावर स्थगिती दिली. मी पर्यावरणवाद्यांच्या सोबत आहे. संभ्रम निर्माण होतो, तेव्हा ती गोष्ट टाळलेली बरी असं माझं मत आहे”, असं ते म्हणाले.

आरेमधील बिबट्याचा वावर…

सत्तेवर आल्यानंतर आरे कारशेडसंदर्भात नव्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आरेमधून कांजूरमार्गला नेलेलं कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यावरून पर्यावरणवाद्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना उद्धव ठाकरेंनी त्यावरून राज्य सरकारला आवाहन केलं आहे.

“मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना विनंती आहे की..”

“माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल. आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. मला धोका हा वाटतो की आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातलं वन्यजीवन धोक्यात येईल. असं करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पाहा नेमकं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले…

“कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झालं तर…”

“आम्ही मुंबईतलं जवळपास ८०० एकरचं जंगल राखीव करून टाकलं आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल”, असं ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde on shivsena uddhav thackeray appeal over aarey colony sgy
First published on: 01-07-2022 at 15:37 IST