मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जीएसटी दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने जीएसटी आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज जीएसटी दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. गेल्या आठ वर्षांत जीएसटी संकलन दुप्पट वाढून २२ लाख कोटींवर गेले आणि याचा सर्वाधिक फटका ग्राहक व छोट्या व्यवसायांना बस. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर कमी करण्याचे श्रेय घेताना आठ वर्षे वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारीही घेतली पाहिजे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
राहुल गांधी यांनी खूप आधीच सांगितले होते की मोदी यांनी जीएसटीला गब्बर सिंग टॅक्समध्ये परिवर्तित केले आहे. दर कमी करून जनतेची लूट थांबवा अशी मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यावर निर्णय घ्यायला मोदींनी काही वर्षे उशीर केला. पेट्रोल-डिझेलच्या दरांवर मात्र मोदी गप्प आहेत. जनतेला स्वदेशीचा उपदेश करणारे पंतप्रधान स्वतः परदेशी गाड्या, घड्याळे, पेन व फोन वापरतात. ‘आत्मनिर्भरते’ची शिकवण देताना स्वतः मात्र ऐषोरामी जीवनशैलीत गुंतलेले आहेत. त्यांनी आज सांगितले की हा बचत महोत्सव आहे मग गेली आठ वर्ष काय लूट महोत्सव सुरू होता का? हेही त्यांनी सांगावे. मोदींच्या जीएसटीवरील भाषणात उत्साह आणि आत्मविश्वासाची कमी होती. कदाचित देशभर घुमणारे “वोट चोर, गद्दी छोड”चे नारे आणि जनतेत वाढत चाललेली नाराजी याचेच ते प्रतिबिंब असावे. पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या भाषणांपेक्षा महागाई, बेरोजगारी, शेती व शेतक-यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.