मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. गेल्या दहा वर्षांतील हा सर्वोच्च आकडा असून, प्रवेशाची टक्केवारी तब्बल ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रवेशाची अंतिम मुदत १४ ऑगस्टवरून ४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
तंत्रशिक्षण संचालनालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे आणि प्रवेश वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अभियांत्रिकी पदविका प्रवेशात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी प्रवेश झाले आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार १४ ऑगस्ट हा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आला होता. मात्र दहावी पुरवणी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी मिळावी, तसेच सणासुदीच्या सुट्ट्यांचा विचार करून तंत्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता ४ सप्टेंबरपर्यंत संस्थांमध्ये जाऊन रिक्त जागांवर प्रवेश घेता येणार आहे. ४ सप्टेंबरपर्यंत दिलेली ही मुदतवाढ पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांबरोबरच थेट द्वितीय वर्ष प्रवेश, तसेच बारावीनंतरच्या एचएमसीटी व सरफेस कोटिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी लागू असणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, जागरुकता मोहीमेमुळे यश
दहावीनंतरचे पदविका अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उच्च शिक्षणाचा उत्तम पर्याय ठरत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, विदाशास्त्र, रोबोटिक्स यांसारखे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहिमा, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार आणि स्वयंअध्ययन मूल्यांकन यांसारख्या उपक्रमांमुळे हा विक्रमी प्रतिसाद मिळाल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.