आठ महिन्यात तब्बल पाच लाख कोटींचे देकार पत्र

मुंबईः राज्यातील गुंतवणुकीचा ओघ कायम असून गुरुवारी विविध ठिकाणी माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी पाच कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या प्रकल्पांच्या माध्यमातून ४७ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यात राज्यात आलेल्या लाखो कोटींच्या गुंतवणुकीपैकी ५ लाख कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना प्रक्रियेअंती उद्योग विभागाने प्रकल्प उभारणीसाठी देकार पत्र दिले आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव आश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन , महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी पी. वेलरासू , उद्योग विभागाचे सह सचिव श्रीकांत पुलकुंडवार, विविध उद्योग समूहाचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग व गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच तत्पर आहे. उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचा सकारात्मक अनुभव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी एमजीएसए रिअॅलिटीचे अध्यक्ष अमरप्रकाश अग्रवाल, इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कार्यकारी संचालक केतन मोदी, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलीप्लेकस कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्य अधिकारी प्रणय कोठारी यांच्या समवेत राज्य शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे सचिव पी. यांनी सामंजस्य करारांचे आदान प्रदान केले.

औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअॅलिटी यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाच हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जात असून यातून दहा हजार रोजगार निर्मिती होईल. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ‘ ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेड कडून तीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून या डेटा सेंटर पार्क मुळे सहा हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील कमलेश्वर लिंगा या ठिकाणी एकात्मिक कोळसा सरफेस वायूकरण डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्प उभारणीसाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कडून ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असून तीस हजार व्यक्तींना यातून रोजगार उपलब्ध होईल. तर पॉलीप्लेकस कार्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून नंदुरबार येथे पॉलिमेरिक उत्पादनांचा प्रकल्पासाठी २ हजार ८६ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून यातून सहाशे व्यक्तींना रोजगार उपलब्ध होईल.

रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून काटोल, नागपूर येथे खाद्य पेये आणि अन्न उत्पादनांच्या निर्मितीसाठी एकात्मिक सुविधा साठी प्रकल्प निर्मितीसाठी १ हजार ५१३ कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत असून याद्वारे पाचशे जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

आठ महिन्यात पाच लाख कोटींचे प्रकल्प मार्गी

राज्यात होणाऱ्या गुंतवणूक सामंजस्य करापैकी अनेक प्रकल्प कागदावरच राहतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गेल्या आठ महिन्यात तब्बल पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागले असून या प्रकल्पांना देकार पत्र देण्यात आल्याची माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. यामध्ये उर्वरित महाराष्ट्रात एक लाख ६६ हजार कोटी, विदर्भात तीन लाख कोटी तर मराठवाड्यात ३० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना देकार पत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे.