जे आपल्या आजीला जमले नाही ते आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी करायला निघाले आहेत. पण गेल्या १० वर्षात सत्तेत असताना तुम्हाला का जमलं नाही याचे उत्तर द्या असे आवाहन करताना शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, १९७२ मध्ये गरिबी हटावची घोषणा दिल्यानंतर आजपर्यंत काँग्रेस जेव्हा-जेव्हा सत्तेत होती त्यावेळी त्यांनी गरिबांसाठी काय केले हा एकप्रकारे गरीबांवर काँग्रेसचा अत्याचार आहे व त्यांच्या भावनांशी खेळणे आहे. जे प्रत्यक्षात करता येणार नाही त्याचे नुसते स्वप्न दाखवायचे आणि गरीबीची चेष्टा करायची हेच काम काँग्रेसच्या मार्फत सातत्याने केले जात असल्याची टिकाही तावडे यांनी आज केली.
प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनीधींशी बोलताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या पत्नीला तिकीट द्यायचे होते मात्र ते देऊ शकले नाहीत आणि नाईलाजास्तव स्वतला घ्यावे लागले. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाला स्वत:ला लोकसभेचे तिकीट मिळविण्यासाठी अध्यक्षपद गमवावे लागले. ही जी त्यागाची परंपरा काँग्रेसने सुरु ठेवली आहे ती राजकीयदृष्टया सामान्य माणूस जाणतो आणि ओळखतो अशी टीप्पणीही तावडे यांनी केली.
पुणे लोकसभेचा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार अजूनही ठरला नाही, त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने २०२४ मधील निवडणुकीचा उमेदवार आताच ठरवून घ्या म्हणजे कोणीतरी उमेदवार तेव्हा निवडणूक लढवायला तुम्हाला मिळेल असा टोलाही तावडे यांनी मारला.
माझे वडील ज्यावेळी सत्तेत असतात त्यावेळी ते अस्वस्थ असतात, विरोधी पक्षात असताना ते शांत असतात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना तावडे म्हणाले की, शरद पवार साहेबांना शांत स्वास्थ मिळाले पाहीजे ही महाराष्ट्राची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षात शांत रहावे आणि आपली प्रकृती सांभाळावी अशा शुभेच्छा आम्ही सुप्रिया सुळे यांना देत आहोत.