मुंबई : गणेशोत्सवात मुंबईत रात्री उशिरापर्यंत अनेक गणेशभक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे दर्शनासाठी जातात. अशावेळी गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी लोकल आणि मेट्रो सुरू ठेवावी, यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकासमंत्री व मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
महापालिकेच्या ग्रॅन्ट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते. गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबईत येतात. त्या काळात भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार सुरू असल्याची माहिती लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. त्यानुसार, लोढा यांच्यामार्फत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे २ दोन हजार नागरिकांनी तक्रारी मांडल्या. त्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी म्हाडा, एस.आर.ए, महानगरपालिका आणि रेल्वेसह बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे न मारता त्यांच्या समस्यांचे जागच्या जागी निराकरण करणे शक्य झाल्याचे लोढा यांनी सांगितले.
म्हाडा संबंधित पुनर्विकास, दुरुस्तीच्या तक्रारींची दखल
जनता दरबारात अनेक नागरिकांनी म्हाडा संबंधित पुनर्विकास, दुरुस्ती आणि संक्रमण शिबिरासंदर्भात तक्रारी मांडल्या होत्या. अनेकदा नागरिकांना संक्रमण शिबिराची सोय न करताच इमारती रिकाम्या करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या होत्या. त्या रहिवाश्यांच्या समस्या लोढा यांनी ऐकून घेतल्या. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायस्वाल यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असून संक्रमण शिबीर झाल्याशिवाय रहिवाशांना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये, अशी सूचना करणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली. तसेच, संक्रमण शिबीर तयार नसल्यास त्वरित इमारतीची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.