मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ३३७ किमीचा, १४ मेट्रो मार्गिकांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील तीन मेट्रो मार्गिका सध्या सेवेत दाखल आहेत. यातील काही मार्गिकांच्या कारशेडचा प्रश्न गंभीर होता. मात्र, आता तो मार्गी लागल्याने पुढील अडीच ते तीन वर्षांत अनेक मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होतील, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी ‘लोकसत्ता शहरभान’ कार्यक्रमात व्यक्त केला.

सध्या कामे सुरू असलेल्या काही मेट्रो मार्गिकांमध्ये कारशेडच्या जागेचा प्रश्न गंभीर होता. कारशेडशिवाय मेट्रो वाहतूक सेवेत दाखलच करता येत नाही. पण आता मात्र सर्व कारशेडचा प्रश्न मार्गी लागला आहे. तेव्हा आता कारशेडची कामे सुरू करत त्या कामांना गती देत कारशेडची कामे पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले.

हेही वाचा >>> नवी मुंबईजवळ नवे नगर -‘एमएमआरडीए’ आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जात आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा आणि ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला नव्या वर्षांत सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात १० आर्थिक विकास केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रस्ते प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प राबवतानाच ‘एमएमआरडीए’कडून पाण्याच्या प्रश्नावरही काम केले जात आहे. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. या प्रकल्पाचा एक टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यांतर्गत वसई-विरारला दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. आता लवकरच दुसरा टप्पा पूर्ण करत मीरा-भाईंदरलाही मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले. चेंबूर ते जेकब सर्कलदरम्यान धावणारी देशातील एकमेव मोनोरेल तोटयात आहे. तिला तोटयातून बाहेर काढण्यासाठी मोनोरेल मेट्रोशी जोडण्यात येत आहे. त्यामुळे जेव्हा मुंबईत मेट्रोचे जाळे पूर्ण होईल तेव्हा अनेक मेट्रो मार्गिका मोनोरेलशी जोडल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.