मुंबई शहरातील अतिधोकादायक अशा २३ इमारतींची यादी म्हाडामार्फत जाहीर करण्यात आली आहे. या इमारती येत्या १५ दिवसांत रिकाम्या करण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.

या इमारतींमध्ये एखादा अपघात घडून जीवितहानी होऊ  नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच म्हाडाकडून खबरदारी म्हणून २३ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात येणार आहेत. मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या पाच इमारतींचाही समावेश या २३ इमारतींमध्ये आहे. या सर्व इमारतींमध्ये ५०७ निवासी आणि ३०७ अनिवासी भाडेकरू राहात आहेत. यापैकी १९७ निवासी भाडेकरूंनी त्यांची स्वतंत्र पर्यायी व्यवस्था केली आहे, तर म्हाडाने सहा रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. उर्वरीत निवासी भाडेकरूंसाठी संक्रमण शिबिराची व्यवस्था म्हाडाला करावी लागणार आहे.

सध्या संक्रमण शिबिरांची कमतरता आहे, मात्र गोराईत ४०० घरे उपलब्ध आहेत. अतिधोकादायक इमारतीतील रहिवासी भाडेकरू इतक्या लांब जाण्यास तयार नाहीत, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिधोकादायक इमारती दक्षिण मुंबई, गिरगाव, भेंडी बाजार, माझगाव, चौपाटी सी फेस, लोअर परळ या परिसरांत या इमारती आहेत. यातील काही इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी विकासकांना देण्यात आली आहे. मात्र त्यांनी पुनर्विकासाचे काम सुरू न केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हाडामार्फत सांगण्यात आले.

विकासकांना नोटीस देऊनही त्यांनी इमारतींची दुरुस्ती केली नाही, तसेच काही इमारतींमध्ये मालक आणि भाडेकरूंच्या वादात इमारतीची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी या इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित कराव्या लागल्या आहेत. या इमारतींमध्ये भाडेकरूंनी राहू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– विनोद घोसाळकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती