मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी ९ ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. मात्र यातील किती अर्जदार सोडतीसाठी पात्र आहेत याची प्रारुप यादी आतापर्यंत कोकण मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. दोनदा प्रारुप यादी लांबणीवर टाकण्यात आली आहे. मंगळवारी (३० सप्टेंबर) पात्र अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र प्रारुप यादीचे काम पूर्ण न झाल्याने ही यादी पुन्हा लांबणीवर पडली आहे. कोकण मडंळाच्या या कारभारावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोकण मंडळाकडून २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ५६५, एकात्मिक योजनेतील ३००२, म्हाडा योजनेतील १६७७, इतर योजनेतील ४१ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी जुलैपासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू होती. सोडतीला प्रतिसाद नसल्याने सोडतपूर्व प्रक्रियेस मंडळाने दोन वेळा मुदतवाढ दिली. त्यामुळे सोडतही दोन वेळा लांबणीवर पडली. दरम्यान नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया पार पडली असून आता पात्र अर्जांच्या प्रारुप यादीच्या आणि त्यानंतर अंतिम यादीची प्रतीक्षा दीड लाखांहून अधिक अर्जदारांना आहे. अशात अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध करण्याची तारीख दोन वेळा कोकण मंडळाने चुकवली आहे. २२ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता ही यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र ही यादी प्रसिद्ध करण्याच्या काही दिवस आधी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख अचानक पुढे ढकलली. २२ सप्टेंबरऐवजी ३० सप्टेंबरला अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध होणार होती. त्यानुसार अर्जदारांचे डोळे या यादीकडे लागले होते. पण सायंकाळी ६ वाजता यादी प्रसिद्ध झालीच नाही.

याविषयी कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता अर्जांची संख्या अधिक असून यादीच्या कामास वेळ लागत आहे. त्यामुळे यादी बुधवारऐवजी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावर अर्जदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याआधी यादी प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलण्यात आली तेव्हा या संबंधीचा कोणताही संदेश आम्हाला आमच्या मोबाइलवर वा ई – मेलवर आला नाही. आजही आम्ही यादी प्रसिद्ध झालेली नाही. आम्ही हक्काच्या घराच्या स्वप्नाच्या अनुषंगाने आमचा अर्ज पात्र ठरला आहे का याकडे लक्ष लावून असतो. त्यावेळी जर आम्हाला व्यवस्थित माहिती मिळत नसेल तर ही बाब अयोग्य असल्याची प्रतिक्रिया एका विजेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. जैलपासून लाखो अर्जदारांचे अनामत रक्कमेचे पैसे म्हाडाकडे अडकून आहेत. आम्ही कर्ज काढून, उसनवारीने अनामत रक्कमेसह अर्ज भरले आहेत. अशा वेळी दोन वेळा सोडत पुढे ढकलली जाते. त्यानंतर प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यासही विलंब होतो ही बाब गंभीर असल्याचे एका विजेत्याने सांगितले.