मुंबई : लोकशाही व्यवस्थेत अल्पसंख्याक समुदाय आणि संप्रदायांसह समाजातील सर्व घटकांत आपल्याला समान वागणूक मिळत असल्याची भावना असणे अत्यावश्यक आहे. विविधता, सर्वसमावेशकता, समानता, सुगमता ही तत्वे फक्त निवडणुकीचा भाग असू नयेत तर ती सर्वकाळ असावित. सार्वमत हा लोकशाहीचा पाया आहे, अशा आशयाचे मत अमेरिकेचे भारतीय राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी व्यक्त केले.

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांमधील मनुष्यबळ रचनेत सर्व स्तरावरील सर्वसमावेशकता आणि विविधतेचे संवर्धन करण्यासाठी अमेरिकी दूतावासातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सहभागी उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर गार्सेटी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारतातील निवडणुकांदरम्यान दिसणाऱ्या सामुदायिक ध्रुवीकरणाचा भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंधावर काही परिणाम होऊ शकतो का याबाबत विचारले असता गार्सेटी यांनी वरील वक्तव्य केले. त्याचवेळी १लोकशाही कशी जपावी यावर मी भाष्य करणार नाही. भारतीय नागरिक त्यांच्या लोकशाहीची काळजी घेतील,असेही ते म्हणाले.

हेही वाचा : मुंबई: ऑनलाईन फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांची चिंता नको

अमेरिकेतील विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना गार्सेटी म्हणाले, १ अमेरिकेतील एकूण परदेशी विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थी हे भारतीय आहेत. तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी निर्धास्त राहावे. विद्यार्थ्यांनाही त्यांचे मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलने होत असतील तोवर काहीच काळजी करण्याचे कारण नाही. अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. सध्या व्हिसासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये दाखल होता येईल.