‘औकात’ दाखवण्याचे वक्तव्य करणाऱया राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रातील जनतेने त्यांचीच जागा दाखवून दिल्यानंतर आता पक्षातर्फे मुंबईत जाहीर सभा घेण्यात येणार आहे. याच सभेत पक्षाच्या पुढील कार्यक्रमाची दिशा राज ठाकरे स्पष्ट करतील, असे पक्षाचे नेते शिशिर शिंदे यांनी मंगळवारी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱयांची आणि पराभूत उमेदवारांची मंगळवारी सकाळी ‘राजगडा’वर चिंतन बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांना राज ठाकरे जाहीर सभेमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. या सभेसाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर खुल्या दिलाने शिवसेनेचे अभिनंदन करण्याऐवजी ‘मोदी जिंकले बाकीसारे हरले’ अशी कुचकट प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या बुकेमागेही राजकारण असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यामुळे चिंतन बैठकीनंतर राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांनी यावेळी मनसेला केवळ नाकारलेच नाही तर आपली मते शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेला सुमारे पंधरा लाख मते मिळाली होती तर यावेळी अवघी सात लाख मते मिळाली असून मनसेचे सर्वच उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th May 2014 रोजी प्रकाशित
मतदारांनीच ‘औकात’ दाखवल्यानंतर आता राज ठाकरे मुंबईत सभा घेणार
'औकात' दाखवण्याचे वक्तव्य करणाऱया राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रातील जनतेने त्यांचीच जागा दाखवून दिल्यानंतर आता पक्षातर्फे मुंबईत जाहीर सभा घेण्यात येणार आहे.

First published on: 20-05-2014 at 10:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns meeting to find out the reasons behind loosing lok sabha election