मुंबई केंद्रशासित करण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही लोकांचं षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला काही दिवसांपूर्वी केला होता. याच आरोपांवरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तरसभेआधी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देताना मनसेने मुंबईत केंद्रशासित करण्याचे आरोप करणाऱ्या संजय राऊतांवरच निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> INS Vikrant Case: फरार असल्याच्या दावा केला जात असतानाच सोमय्या समोर आले; गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले, “राऊत साहेब…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राऊत नेमकं काय म्हणालेले…
मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. “किरीट सोमय्या खोटे कागद घेऊन नेहमी दिल्लीत जात असतात. किरीट सोमय्या आणि त्यांच्या लोकांचं मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात मोठं षडयंत्र सुरु आहे. या लोकांनी गृहमंत्रालयाला सादरीकरण दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत,” असं पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी म्हटलं होतं.

मुंबईच्या शाळात मराठीसक्ती असू नये यासाठी किरीट सोमय्या कोर्टात गेले होते. तेव्हापासून त्यांचं हे सुरु आहे. आता केंद्रात भाजपाचं सरकार आल्याने या महाराष्ट्रद्वेष्टांना बळ मिळालं आहे,” असंही संजय राऊत म्हणाले होते.

नक्की वाचा >> INS Vikrant Scam: समोर आला संजय राऊतांचा सोमय्यांसोबतचा ९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो; BJP म्हणते, “नॉटी दांभिक…”

पुरावे असल्याचाही दावा
“मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं सादरीकरण भाजपाच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केलं आहे. या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे आहे. काही करुन त्यांना मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे. मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,” असा दावा संजय राऊतांनी केला होता.

नक्की वाचा >> सोमय्या बेपत्ता : राष्ट्रवादीने अमित शाहांवर साधला निशाणा; म्हणाले, “‘झेड प्लस’ सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊ शकत नाही कारण…”

मनसेने दिली प्रतिक्रिया…
“विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब ‘ईडी” द्यायचाय त्याची चिंता करावी,” असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरुन लगावला आहे. तसेच पुढे बोलताना, “राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही,” अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडेंनी मनसेच्यावतीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय.

दिल्लीत मराठी माणसाविरोधात सादरीकरण…
आधी मुंबई, महाराष्ट्राला बदनाम केलं जाणार आहे, हे षडयंत्र महाराष्ट्रासाठी मोठा धोका असून मुख्यमंत्र्यांनाही याची माहिती आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. मी काही पेन ड्राईव्ह वैगेरे घेऊन फिरत नाही. मी बोलतोय ते सत्य आहे,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. “भाजपाचं मुंबईला केंद्रशासित करण्याचं जे कारस्थान आहे त्याचे सूत्रधार किरीट सोमय्या आहेत. याशिवाय आणखी दोन महत्वाचे अमराठी लफंगे आहेत त्यातील एक वाराणसीचा आहे आणि एक मोठा बिल्डर आहे जो भाजपाचा फायनान्सर आहे. ते सातत्याने दिल्लीत जाऊन मुंबईवर शिवसेनेचं, मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये यासाठी गृहमंत्रालयाला सादरीकरण दिलं आहे,” असा दावा संजय राऊतांनी केलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns slams sanjay raut says no one can dare to make mumbai as union territory scsg
First published on: 12-04-2022 at 13:07 IST