मुंबई : पश्चिम उपनगराची पावसाच्या तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मोगरा उदंचन केद्रांच्या बांधणीत आता आणखी एक अडथळा उभा राहिला आहे. या उदंचन केंद्राची जागा मुंबई महापालिकेच्या वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाच्या आड येत आहे. त्यामुळे उदंचन केंद्राची जागा थोडी सरकवावी लागणार आहे. त्यामुळे या उदंचन केंद्राचे पुन्हा नव्याने आरेखन व नियोजन करावे लागेल.

सर्व बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीच्या वेळी पावसाचे पाणी साचते. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात शिरत असल्यामुळे पातमुख बंद करावे लागतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून ब्रिमस्ट्रोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईत आठ ठिकाणी पर्जन्य जल उदंचन केंद्रे उभारण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता. त्यापैकी हाजीअली, ईर्ला, लवग्रोव, क्लिव्हलॅण्ड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा उदंचन केंद्रे बांधून कार्यान्वित झाली आहेत. तर, अंधेरी येथील मोगरा नाल्यावरील उदंचन केंद्राचे व माहूल उदंचन केद्राचे काम मात्र जागेअभावी रखडले आहे.

पाच वर्षांपूर्वी पालिकेने मोगरा व माहुल या दोन उदंचन केंद्रासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र जमीन अधिग्रहण होऊ न शकल्यामुळे या निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोगरा उदंचन केंद्र हे नाल्याच्या प्रवाहातच बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र नाल्याच्या जमिनीच्या मालकीचा मुद्दा न्यायालयात गेला. या जागेवर दोन जणांनी दावा केला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे मोगरा उदंचन केंद्र रखडले होते. न्यायालयाने या प्रकल्पाबाबत कोणतेही काम करण्यास मनाई केल्यामुळे हे काम रखडले होते. मात्र गेल्यावर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये न्यायालयाने ही स्थगिती उठवली. या वादातील तोडगा म्हणून पालिकेला ३३ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र या कामामध्ये आता नवीनच पेच निर्माण झाला आहे.

मोगरा उदंचन केंद्र मोगरा नाल्याच्या प्रवाहातच बांधण्यात येणार आहे. मात्र ही जागा वर्सोवा -दहिसर दरम्यान प्रस्तावित सागरी किनारा मार्गाच्या आड येत आहे. त्यामुळे प्रकल्पाची जागा थोडी पश्चिम दिशेला सरकवावी लागणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ३३ कोटींची रक्कम न्यायालयात जमा केली असून काम सुरू करण्यास न्यायालयाने परवानगीही दिली आहे. मात्र आता उदंचन केंद्राची जागा आता थोडी पश्चिम दिशेला नेण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचे नव्याने आरेखन करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यानंतर या प्रकल्पाचे काम हाती घेतले जाईल.अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९० कोटींचे कंत्राट आणि चार वर्षे

अंधेरी, जोगेश्वरी, मालपाडोंगरी ते वर्सोवा या भागातील ७.४३ चौ. किमी. क्षेत्रामधील पावसाचा पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने मोगरा नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात उदंचन केंद्र उभारण्याचे ठरवले होते. त्याकरीता २९० कोटींचे कंत्राट देण्याचे २०२१ मध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र चार वर्ष प्रकल्प रखडल्यामुळे आता या प्रकल्पाचा खर्च वाढणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.