मुंबई : मुंबई महानगरपालिकेत सद्यस्थितीत १४ प्रमुख अभियंते कार्यरत असून नागरी सेवेची ८० टक्के कामे अभियंता संवर्ग आणि महापालिका कामगार यांच्यामार्फत केली जात आहेत. अखंड पाणीपुरवठा, मलनिःसारण वाहिन्या, रस्ते व पुलांची डागडुजी, रुग्णालये, स्मशानभूमी आदी आवश्यक सेवेतील कामे अभियंते व कामगार पार पडत आहेत. तसेच, अभियंत्याकडे समानवाय साधून प्रभावीपणे काम करण्याची क्षमता असल्यामुळे महापालिकेच्या आपती व्यवस्थापन विभागात प्रमुख अभियंता हे पद निर्माण करावे. तसेच, त्यावर तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातून केली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करून पालिकेचा कारभार चालविला जात आहे. यंदा मोसमी पावसाच्या पहिल्या दिवशीच शहराची बिकट अवस्था झाली होती. परिणामी, मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. आपत्ती व्यवस्थापन विभागातील नियोजनशून्यता या परिस्थितीला जबाबदार असल्याचा आरोप म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानगरपालिकेतील अभियंत्यांना विविध कामांचा अनुभव असूनही आपत्ती व्यवस्थापन विभागात त्याच्यासाठी जागा नसणे हे अन्यायकारक आहे. महानगरपालिकेत अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध अभियंत्यांवर कामाचा ताण येत आहे. असे असूनही अभियंते विनातक्रार काम करीत आहे. भविष्यात आपत्ती व्यवस्थापनात होणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्रमुख अभियंता (आपत्ती व्यवस्थापन) हे पद निर्माण करावे. तसेच, तातडीने त्या पदावर अभियंत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी इंजिनीअर्स असोसिएशनने केली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांना पात्र पाठविण्यात आले आहे.