मुंबई : इन्स्टाग्रामवरील रिल पाहून जुनी नाणी विकण्याचा निर्णय एका महाविद्यालयीन तरूणाला चांगलाच महागात पडला. सायबर ठकसेनाने त्याच्याकडील पाच नाणी विकत घेण्याचे आमिष दाखून त्याची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक केली. या तरुणाची अवघ्या पाच दिवसांत फसवणूक करण्यात आली.

फिर्यादी २२ वर्षांचा असून मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याने इन्स्टाग्रावर ६ जून रोजी एक रिल पाहिले. या रिलमध्ये जुनी दुर्मिळ नाणी विकत घेण्यात येतील, असे सांगण्यात येत होते. फिर्यादीच्या संग्रहात पाच जुनी नाणी होती. फिर्यादीने कुतूहलापोटी आपल्याकडे असलेल्या पाच जुन्या नाण्यांचे छायाचित्र काढून त्या रिलमध्ये दिलेल्या क्रमांकावर पाठवले. त्यावेळी त्याला पंकज सिंग नामक एका व्यक्तीने फोन केला. ‘ओल्ड कॉईन शॉप’मधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादी तरुणाने पाठवलेली जुनी नाणी पसंत पडली असून या नाण्यांच्या मोबदल्यात कंपनी ९८ लाख रुपये देण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. पाच नाण्यांच्या मोबदल्यात एवढी मोठी रक्कम मिळणार असल्याने हा तरुण खूष झाला आणि अलगद त्यांच्या जाळ्यात अडकला.

पाच दिवसांत २२ लाख रुपये गमावले

फिर्यादी तरूण त्यांच्या जाळ्यात अडकल्यानंतर ठकसेनांनी त्याची फसवणूक करण्यास सुरवात केली. त्याला रिझर्व्ह बॅंकेचा एका अर्ज भरण्यासाठी दिला. त्यानंतर नोंदणी शुल्क म्हणून ६९९ रुपये युपीआयद्वारे घेतले. नंतर ओळखपत्र म्हणून फिर्यादी तरूणाचा वाहन परवाना मागून घेतला. आता आपल्याला ९८ लाख रुपये मिळणार याची तरुणाला खात्री वाटू लागली. मग विविध शुल्क, कर आदीच्या नावाखाली त्यांनी तरुणाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. या तरुणाने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाच दिवसांत २२ लाख रुपये सायबर भामट्यांच्या खात्यावर पाठवले. यानंतर गुप्ता नावाची व्यक्ती पैसे घेऊन येत असल्याचे तरूणाला सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैशांची वाट बघत असताना या तरुणाला विक्रम गोस्वामी नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण दिल्लीतील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. पैसे घेऊन येणाऱ्या गुप्ताला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे ९८ लाख रुपयांचे काळे धन (ब्लॅक मनी) सापडल्याचे त्याने सांगितले. हे पैसे व्हाईट करायचे असतील तर ६ लाख ३० हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. मात्र या प्रकाराबद्दल तरुणाला संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला आणि सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांच्या पश्चिम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड), भारतीय न्याय संहितेच्या ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.