मुंबईतील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, समाधान व्यक्त करत काही सूचना देखील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या आहेत. "मुंबईकरांनी नियमावली पाळली, दिलेल्या सूचना ऐकल्या म्हणूनच आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवू शकलो असं म्हणायला हरकत नाही. आताही मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नक्की नाही. त्यामुळे, काळजी करायची नाही. घाबरायचं नाही. पण सांभाळायला पाहिजे", असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना केलं आहे. त्याचसोबत, नवरात्रीचा सण देखील छोटेखानी पद्धतीने साजरा केला जावा असंही महापौर म्हणाल्या . "मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निश्चितच नाही. मुंबईकरांनी नियम पाळल्याने आपण या लाटेला थोपवण्यात यशस्वी झालो आहोत. पण सांभाळायला हवं. नियम पाळायला हवेत. नियमित मास्क वापरणं, लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणं या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या. आता लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार यांचे आभारच. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर, टास्क फोर्स आणि तज्ज्ञ मंडळी यांच्या मार्गदर्शनानुसारच आपण सर्व पावलं टाकत आहोत. त्यामुळे कोणीही घाबरू नका. फक्त खबरदारी घ्या", अशा सूचना महापौरांनी केल्या आहेत. "नवरात्रीत होणाऱ्या गरब्यावर राज्य सरकारने संपूर्ण राज्यभरात बंदी घातली आहे. त्यामुळे, शहरात देखील नवरात्रीच्या निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम करायचेत आहेत. येणाऱ्या दिवाळीसाठी जय्यत तयारी करायची आहे. पण, हे सगळं स्वतःची काळजी घेऊन आणि सर्व नियमांचं पालन करून. इतकं जरी केलंत तरी तिसऱ्या लाटेत सुरक्षित होण्यास आपण पूर्ण यशस्वी होऊ", असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.